Monday, October 17, 2022

लाल सिंग चढ्ढा


"लाल सिंग चढ्ढा":एक नितांत सुंदर अनुभव

चित्रपट हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आणि व्यक्त होण्याचे एक प्रभावी माध्यम आहे असे मला वाटते.आपल्या आजूबाजूला होणाऱ्या घटनांचा प्रभाव चित्रपटावर पडत असतो आणि तो चित्रपटाच्या माध्यमातून व्यक्त होत असतो पण कधी कधी याच्याबरोबर उलट होतं. चित्रपटाशी संलग्न गोष्टींचा व्यक्तींचा समाजावर (चुकीचा) प्रभाव पडतो आणि मग त्या चित्रपटाला त्याचे परिणाम भोगावे लागतात.एका चांगल्या कलाकृतीची हानी होते. चित्रपट कला ही जरी समाजाभिमुख असली तरी चित्रपट हा एक स्वतंत्र विषय आहे असं मला वाटतं. ज्यामध्ये एखाद्याला आपली कला सादर करण्याचा आपल्या विचारांनी व्यक्त होण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण दुर्दैवाने असं होत नाही.हे सगळं मी बोलतोय कारण अशाच परिणाम भोगलेल्या एका चित्रपटाचा OTT वर पुनर्जन्म झाला आणि तो चित्रपट म्हणजे "लालसिंग चढ्ढा".
हा चित्रपट याच वर्षी 11 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित झाला (त्याच्याभोवती असलेल्या वादाबद्दल मला काही बोलायचं नाहीये पण एक स्वतंत्र चित्रपट म्हणून लाल सिंग चड्डा हा एक नितांत सुंदर अनुभव आहे एवढं मात्र नक्की.) लगेचच पडला.बऱ्याच लोकांना तो दुर्बोध वाटला. ९०% लोकांनी त्याची तुलना ज्या चित्रपटावर तो बेतला आहे त्या  "FOREST GUMP" या चित्रपटाशी केली म्हणूनही असेल किंवा दुसरी अनेक (चुकीची) कारणे असतील पण हा चित्रपट सिनेमागृहात चालला नाही किंवा मुद्दामून त्याला पाडण्यात आले माहित नाही. पण आता "OTT PLATFORM" वर हा चित्रपट प्रचंड गाजतो आहे आणि घरी बसून शांतपणे ज्यांनी हा चित्रपट बघितला त्यांना आता समजतंय की केवढी मोठी चूक केली.( आणि आता मोठ्या संख्येने लोक या चित्रपटाबद्दल मनापासून व्यक्त होत आहेत).
पहिल्यांदा या चित्रपटाबद्दल थोडेसे!!! "लालसिंग चढ्ढा" हा नव्वदीच्या दशकामध्ये आलेल्या "FOREST GUMP" या चित्रपटाचा REMAKE आहे म्हणजेच पुनरावृत्ती आहे.
"ERIK ROTH" या पटकथाकाराने अमेरिकी इतिहासात घडलेल्या कालातीत घटनांचा संदर्भ घेऊन एक बांधेसूद पटकथा बनवली ज्याला "ROBERT ZEMECKIS"सारख्या सर्जनशील दिग्दर्शकाची जोड मिळाली आणि "TOM HANKS" या मातब्बर अभिनेत्याने या चित्रपटातील प्रमुख भूमिकेचे सोने केले होते. त्या वर्षीच्या ऑस्कर सोहळ्यातही या चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावत आपली छाप सोडली होती.या चित्रपटाची पुनरावृत्ती करण्याचे शिवधनुष्य उचलणे हीच एक स्वतःमध्ये फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं आणि हे शिवधनुष्य लीलया आमिर खान प्रोडक्शन्स,आमिर खान स्वतः,अद्वैत चंदन; या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि या चित्रपटाची पटकथा ज्यांनी लिहिली ते अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी लिलया पेलले आहे असे मला वाटते. मुळात एखाद्याने आधीच जर असं हिमालयासारखं कर्तृत्व करून ठेवलं असेल तर त्याला समांतर अशी पटकथा लिहिणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे.अतुल कुलकर्णी यांनी ते शक्य करून दाखवले आहे. निव्वळ अप्रतिम पटकथा!!! भारतीय इतिहासातील घडून गेलेल्या काही घटनांचा संदर्भ घेऊन त्या "लाल"च्या आयुष्यभराच्या प्रवासात अत्यंत खूबीने पेरून बांधीव अशी पटकथा अतुल कुलकर्णी यांनी तयार केली त्याबद्दल त्यांना शंभर पैकी शंभर मार्क.अद्वैत चंदन या तुलनेने नवख्या दिग्दर्शकाने अतुलजींच्या पटकथेला योग्य न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे नव्हे तो 100% यशस्वी झालाय असेच मी म्हणेन आणि अद्वैतच्या या प्रयत्नांना चित्रपटातल्या तगड्या कलाकारांची योग्य साथ मिळाली आहे.करीना कपूर खान हिने साकारलेली "रूपा डिसूजा" अप्रतिम आहे तीच गोष्ट बाला झालेल्या चैतन्य अकीनेनी या तेलुगु अभिनेत्याची. मानव वीज यांनी साकारलेला मोहम्मद हा पाकिस्तानी सैनिक लक्षात राहतो आणि आमिर खान बद्दल काय बोलायचं.आत्ममग्न असलेला,प्रेमाचा भुकेला,सरळमार्गी लालसिंग चढ्ढा आमिरने ज्या ताकदीने उभा केलाय त्याला तोड नाही.अमीर ही भूमिका जगलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि हे असं आमिरच्या प्रत्येक भूमिकांच्या बाबतीत म्हणता येईल. उदाहरणच घ्यायचं झालं तर 'दंगल'मधला त्यांनी उभा केलेला महावीर सिंग फोगाट बघा METHOD ACTINGचा तो एक अप्रतिम नमुना आहे.(या भूमिकेसाठी आमिरने वजन वाढवलं,कुस्ती शिकली तरी त्यावर्षी सर्वोत्तम अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार आमिरला डावलून अक्षय कुमारला त्याच्या "रुस्तम" या सुमार चित्रपटातल्या टुकार भूमिकेसाठी देण्यात आला होता. असो!!!) या चित्रपटातलं त्याचं आत्ममग्न बोलणं,डोळे मिचकावणं या लकबी लोकांना खटकू शकतात. पण आत्ममग्न लोक अशीच असतात;त्यामुळेच ती दुसऱ्यांना थोडीशी वेडी वाटतात पण खरं तर ती तशी नसतात."लाल"च्या मनात चाललेली भावनाची आंदोलनं आमिरने अवघ्या देहबोलीतून इतक्या ताकदीनं व्यक्त केली आहेत त्याला तोड नाही. निव्वळ अप्रतिम!!! आमीर काय ताकदीचा अभिनेता आहे हे जर बघायचं असेल तर या चित्रपटातला तो आपल्या मुलाला भेटतो त्याप्रसंगी व्यक्त झालेला अमीर बघा मग तुम्हाला कळेल मी काय म्हणतो ते.....
तांत्रिकदृष्ट्याही चित्रपट कमाल आहे.सेतू यांचं छायाचित्रण आणि प्रीतम यांचे म्युझिक चित्रपटाला अनुरूप असेच आहे. एकूणच काय एक नितांत सुंदर चित्रपट बघायचा असेल तर "लालसिंग चढ्ढा" जरूर बघावा फक्त आपले पूर्वग्रहाचे चष्मे बाजूला काढून हा चित्रपट बघा एक नितांत सुंदर अनुभव नक्की मिळेल तुम्हाला!!!
"लालसिंग चढ्ढा" आता "NETFLIX"वर प्रदर्शित झाला आहे.

अमित अशोक परब
@amitashokparabofficial

Saturday, October 1, 2022

अभिष्टचिंतन

प्रिय उदय दादा, 

सप्रेम नमस्कार, 

आज तुझ्यासाठी खास दिवस आहे आणि याप्रसंगी तुला एका अलिखित वैश्विक सत्याची आठवण नक्कीच झाली असावी. माणसाला आपले पहिले प्रेम कधीच विसरता येत नाही आणि ते ज्या क्षणी त्याच्यापासून दूर जाते तो क्षण फार त्रासदायक असतो.आपण कितीही स्थितप्रज्ञतेचा आव आणला तरी मन भरून येते,डोळे झरू लागतात,सगळ्या जुन्या आठवणींची रिळं एकामागून एक मनाच्या पटलावर चालतात.तुझ्यासाठी फारच भावनिक क्षण असेल तो.... नक्कीच!!!
आज तुझे पहिलं प्रेम,तुझी कंपनी,ज्या कंपनीमध्ये ( तुझ्या आजच्या वयाच्या हिशेबाने) जवळजवळ आपलं अर्ध्याहून अधिक आयुष्य व्यतीत केलंस,त्या "LARSEN & TOUBRO" कंपनीच्या मोठ्या पदावरून तू सेवानिवृत्त होतोयस..
खरंतर सेवानिवृत्ती ही सुद्धा एक नवीन सुरुवात असते.पण प्रत्येकाला असं "पुनःश्च हरी ओम्" करणं जमत नाही.त्या कंपनीशी, तिथल्या माणसांशी ऋणानुबंध जुळलेले असतात.त्या सर्व वातावरणाची सवय जडलेली असते;नव्हे तो आपल्या जीवनशैलीचाच एक भाग झालेला असतो.म्हणून जेंव्हा केंव्हा असा प्रसंग वाट्याला येतो तेंव्हा ते कटू वास्तव स्वीकारणं बऱ्याच जणांना जड जाते.निवृत्तीपश्चात अशी माणसं मग उगीचच कटू आणि कटकटी बनतात.त्यात तू  "L & T"मधील "HEAVY MACHINE SHOP"मध्ये कामाला!!! त्यामुळे आजूबाजूला असलेले रूक्ष धातू आणि विविध वाणाच्या मशीनींच्या सानिध्यात बराच काळ असलेल्या माणसाला त्यांचा गुण लागायची शक्यता असते पण तुझ्या बाबतीत असं काही घडायची सुतराम शक्यता दिसत नाही. कारण तुझी रसिक कलाकारवृत्ती आणि तू जोपासलेले छंद.
                        तू एक चांगला गायक आहेस,फार वरच्या दर्जाचा चित्रकार-छायाचित्रकार आहेस,इंग्रजी भाषेवर तुझे प्रभुत्व आहे;या साहेबाच्या भाषेत तू केलेले लिखाण वाचनीय असते.शिवाय तुझ्या मनातला नवीन हळवा कोपरा,तूझे कोकणातले टुमदार घर "अद्वैत" आहेच.त्यामुळे आमच्यासारख्या तुझ्या सुह्रुदांना तू सेवानिवृत्त झाल्यावर काय करणार याची चिंता नाही.
                 आपल्या तारुण्यात तू एक चांगला फलंदाज म्हणूनही लोकप्रिय होतास.आपले जुने घर,मुलुंड(पूर्व)ला असलेल्या जीवन नगर सोसायटीच्या स्थानिक क्रिकेट सामन्यांमध्ये तू लगावलेले षटकार अजूनही लोकांच्या लक्षात आहेत;त्यामुळे या तुझ्या 2ND INNINGमध्येही तू चांगली बॅटिंग करशील याची खात्री आहे.
निरोपाचे भाषण करताना आपल्या घरच्यांचे आणि सुह्रुदांचे आभार मानायचे शास्त्र असते,ते जरूर पाळ.कंपनीत २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल कंपनीकडून मिळालेले घड्याळ नक्की घाल आणि जर भावना अनावर झाल्या तर मोकळ्या मनाने अश्रूंना वाट करून दे.तिथे उगीचच स्थितप्रज्ञतेचा आव आणू नकोस.
दादा तू त्या भावनिक पिढीचा प्रतिनिधी आहेस ज्यांनी मिळालेली नोकरी आणि जिच्याशी लग्न झालं त्या छोकरीशी आयुष्यभर इमाने इतबारे निभावलं.अंगावर आलेल्या सर्व जबाबदाऱ्या खंबीरपणे पेलल्या.भाऊ,मित्र,मुलगा,पिता अशी नातीही मनापासून जपली. 
सुचिता वहिनीचे आभार मानायला विसरू नकोस,कारण तुझ्या आजवरच्या गृहस्थाश्रमाच्या प्रवासामध्ये तिची खंबीर साथ तुला होती,आहे आणि या पुढेही असणार आहे.
तुझ्या या सन्मानजनक निवृत्तीबद्दल उदय दादा तुझं अभिष्टचिंतन!!! आणि तुझी आतुरतेने वाट बघणार्या तूझ्या 2ND INNINGसाठी तुला डोंगराएवढा शुभेच्छा!!! 

तुझा लाडका भाऊ 

अमित

Sunday, September 18, 2022

अंतिम क्षण


झाडावरून ओघळणाऱ्या फुलासम
माझा अंतिम क्षण असावा
हे जग सोडून जात असताना
कसलाही आवाज न व्हावा

अमित अशोक परब 


सध्या पितृपंधरवडा चालू आहे आणि माझ्या वडिलांचा आज दिवस आहे. त्यानिमित्ताने सुचलेली ही चारोळी.👆
माझ्या वडिलांची शिकवण,त्यांचं प्रेम आणि इतरही अनेक 
त्यांच्या चांगल्या गोष्टी जश्या आयुष्यभर माझ्या लक्षात राहतील तसाच कायम स्मरणात राहील त्यांचा अंतिम क्षण!!!! कारण तो झाडावरून ओघळणाऱ्या फुलासारखा होता.
झाडावरून जेव्हा एखादं फुल ओघळतं तेव्हा त्याचा कसलाही आवाज होत नाही आणि त्यामुळे ते ओघळल्याचे समजतही नाही.तसंच काहीसं झालं.
पप्पांना सुपारीच्या खांडाचेही व्यसन नव्हतं.तरुण वयात अंगमेहनतीची काम केल्यामुळे आणि व्यायामाची मुळातच आवड असल्यामुळे वयाची साठी ओलांडल्यानंतरही त्यांची प्रकृती वर्धिष्णू होती. पण २४ मे २०१८चा तो दिवस आणि तो क्षण चुकला नाही.कसल्याही मोठ्या आजारपणाचा सामना करावा लागला नाही वा अंथरुणात पडून राहावं लागलं नाही.स्वतःला आणि दुसऱ्यालाही नकोसं असणारे म्हातारपण त्यांच्या नशिबात आलं नाही.शांतपणे झोपेतच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.असा अंतिम क्षण ज्याच्या नशिबात त्याला पुण्यवान माणूस असं म्हणतात.आज हे सगळे विचार मनात डोकावत असताना क्षणभर वाटून गेलं माझ्याही नशिबात असा अंतिम क्षण असेल काय?बहुदा नसावा!! कारण तेवढं पुण्यही गाठीशी असावं लागतं.........😔



Thursday, August 12, 2021

अण्णा पन्नाशी

मी माझ्या आई-वडिलांचा एकुलता एक!!! मला सख्खे भावंडं नाही.पण मला माझ्या नात्यातल्या भावंडांचे खूप प्रेम लाभले आहे.त्या बाबतीत मी खूपच भाग्यवान आहे.त्यातही माझ्या सख्ख्या आत्येभावांचे म्हणजे तीनही कुडतरकर बंधूंचे प्रेम मला जरा जास्तच लाभले आहे.माझे सख्खे भाऊ वाटावेत असे हे तिघे. याच माझ्या तीन भावांपैकी सर्वात धाकट्या पातीचा म्हणजे माझ्या अजित अण्णाचा आज सुवर्ण महोत्सवी अर्थात ५०वा वाढदिवस.
मी त्याला "अण्णा" अशी हाक का आणि कधी मारायला लागलो मलाच माहीत नाही. (पुढे जाऊन तो दक्षिण भारताचा जावई होणार आहे असं मला कुठेतरी दिसलं असावं म्हणून असेल कदाचित!!! दक्षिण भारतीय लोक मोठ्या भावाला "अण्णा" म्हणतात म्हणून मी त्यालाही अण्णा म्हणायला सुरुवात केली असावी.) खरं तर त्याला अण्णा म्हटलेलं अजिबात आवडायचं नाही.तो नेहमी मला दरडावून सांगायचा "ए मला अजित म्हण!! "अण्णा" म्हणून हाक मारू नकोस!!!" मग मी पण मुद्दाम तो चारचौघात विशेषतः त्याच्या खास मित्रांच्या गोतावळ्यात असला की त्याला चिडवायला लांबून त्याला "अण्णा" म्हणून हाक मारायचो. सुट्टी पडली की मामाच्या गावाला जाऊया असे आपल्या लहानपणी म्हणायचे माझ्या बालपणीतल्या बहुतेक सुट्ट्या ह्या मुलुंडला माझ्या आत्याच्या घरी जीवन नगर सोसायटीत गेल्यात. माझा सर्वात मोठा दादा उदय माझे सर्व लाड पुरवायचा.दोन नंबरचा भाऊ ऋतुराज माझी खूप काळजी घ्यायचा.पण अण्णा माझा यार होता. खेळातला सवंगडी होता.त्याचे कितीतरी क्रिकेटचे सामने मी केवळ प्रेक्षक म्हणून बघायला जायचो.त्याची गोलंदाजी इतकी भन्नाट होती की त्याच्या गोलंदाजीला त्याच्या एरियातले तत्कालीन भले भले फलंदाज घाबरायचे.भन्नाट वेगाने चेंडू टाकणारा सहा फूट उंच माझा अण्णा पाहणे म्हणजे एक पर्वणी असायची आणि आपल्या पहिल्याच षटकात समोरच्या संघातला गडी बाद करण्यात त्याचा हातखंडा होता.त्या क्षेत्रात पुढे गेला असता तर तो खरंच एक नावाजलेला गोलंदाज झाला असता यात काही शंकाच नव्हती.पण त्याने वेगळे क्षेत्र निवडले.त्यातही आपल्या मेहनतीच्या आणि चिकाटीच्या जोरावर तो आज खूप मोठ्या पदावर आहे.
त्याचा जन्म १३ तारखेचा!! तेरा ही अशुभ तारीख समजली जाते. पण आपल्या कर्तृत्वाने अण्णाने ही तारीख किती शुभ असू शकते हे सिद्ध करून दाखवले आहे.तीन भावंडांत तो सर्वात धाकटा!!! पण या तिन्ही भावंडांमध्ये बऱ्याच बाबतीत त्याने पहिला नंबर लावला आहे. मुंबईच्या बाहेर नोकरी करायला गेलेला या तीन भावांतला तो पहिला.नोकरीनिमित्ताने परदेशवारी करणाराही पहिला तोच आणि या तीन भावंडांपैकी चार चाकी गाडी घेणाराही तोच पहिला.
असं म्हणतात की नशीब हे कर्तुत्ववान माणसालाच नेहमी साथ देते.आयुष्यभराचं जोडीदार हा चांगला मिळणे हा सुद्धा एक नशिबाचाच भाग असतो.त्याबाबतीत अण्णा खरंच नशीबवान आहे की दिव्या वहिनीसारखी साक्षात लक्ष्मी त्याच्या आयुष्यात आली.आता त्यांच्या आयुष्यात "अध्यन"चाही प्रवेश झाला आहे.अण्णाच्या मुळच्या भ्रमरवृत्तीमुळे,मनस्वी स्वभावामुळे त्याचे कसे होणार??? अशी त्याच्या आईला म्हणजे माझ्या सुहासिनी(मंदा)आत्याला नेहमी काळजी असायची.त्याच आमच्या अण्णाला आज एक उच्चपदस्थ अधिकारी ,उत्तम गृहस्थ, एक अतिशय चांगला पिता आणि प्रेमळ नवरा अश्या विविध भूमिकांमध्ये सहज वावरताना बघून आत्याला खूप आनंद झाला असता.
असा माझा अण्णा आज त्याच्या आयुष्यातले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे.त्याबद्दल त्याला अनेक शुभेच्छा.......
Happy Birthday अण्णा!!!


Saturday, May 29, 2021

MISS YOU ABU

उद्या दि.३० मे 2021 रोजी आमच्या लाडक्या "अभिषेक भार्गव" ला ज्याला प्रेमाने आम्ही सगळे "अबु" म्हणायचो त्याला जाऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. फारच तरुण वयात तो आम्हा सगळ्यांना सोडून निघून गेला.विलेपार्ले विधानसभेमधला "भाजप" चा एक उत्साही कार्यकर्ता आणि सर्वांचा लाडका असलेला अभिषेक भार्गव माझा ही खूप जवळचा मित्र होता.आमच्यासारख्या स्थूल प्रवृत्ती व्यक्तींना चिडवण्यासाठी एक शब्द नेहमी वापरला जातो आणि तो म्हणजे "बटाटा"!!! पण बर्‍याच लोकांना हे माहिती नाहीये किंवा असेल ही की बटाटा हे एक बहुआयामी कंदमुळ आहे.बटाटा मटणात चालतो आणि उपवासालाही चालतो. प्रत्येक भाजीत बटाटा वापरला जाऊ शकतो.त्यातही आपले अस्तित्व कधीच सोडत नाही. मुंबईची ओळख असलेला "वडापाव"चा महत्त्वाचा घटक म्हणजे बटाटा.अगदीच काही खायला नसेल तर एक बटाटा उकडून त्याला तिखट-मीठ लावून खाल्लं तरी पोट भरू शकते.असा हा बहुआयामी बटाटा!!! आमचा अबूही तसाच अगदी बहुआयामी.कोणतेही काम असो अबू कधी कुठल्याच कामाला नाही बोलला नाही. तो एक यशस्वी उद्योजक होता, एक हाडाचा कार्यकर्ता होता.फार तरूण वयात तो प्रभाग क्रमांक ८५ चा अध्यक्ष झाला आणि तिथेही त्याने फार उल्लेखनीय कामगिरी केली.पार्ले महोत्सवाचा तर तो कित्येक वर्ष अविभाज्य अविभाज्य घटक होता. परागजींच्या अत्यंत विश्वासातल्या कार्यकर्ता वर्तुळापैकी तो एक सर्वात तरुण कार्यकर्ता होता आणि हे सगळे त्याने आपल्या मेहनतीने आणि आपल्या गोड स्वभावाने कमावले होते. खानदानी श्रीमंत असला नीगर्वी होता. सर्वांशी मिळून मिसळून वागायचा.सर्वांची थट्टा मस्करी तर करायचाच पण स्वतःवरची थट्टा मस्करी हसत मुखाने सहन करायचा.कधी कोणाशी भांडण झाले तरी ते भांडण पुढच्या क्षणी विसरून त्या माणसाची सलगीने वागायचा.म्हणूनच आज तो  आपल्यात नाही हे खरे वाटत नाही.आजही त्याच्या आठवणीने अनेकांचे डोळे पाणावतात. विशेषतः त्याला मानसपुत्र मानणाऱ्या श्रीकृष्ण आंबेकरांचे.आजच माझी त्यांची भेट झाली होती तेव्हा त्याच्या आठवणीने आंबेकरजी गहिवरून गेले.असा होता आमचा अबू. उद्या दि.३० मे 2021 रोजी अबूच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त विलेपार्ले विधानसभेच्या वतीने खासदार पूनम महाजन निर्मित "मोक्षरथ लोकार्पण सोहळा" सकाळी १० वाजता उत्कर्ष मंडळ,विले पार्ले(पू.) येथे आयोजित करण्यात आला आहे. FACEBOOKच्या माध्यमातून तो LIVE सगळ्यांना दिसू शकणार आहे.मला याची खात्री आहे की आमच्या लाडक्या अबूवर प्रेम करणारे व त्याला ओळखणारे अनेक जण उद्या FACEBOOKच्या माध्यमातून नक्कीच हा सोहळा बघतील आणि हीच आमच्या लाडक्या अबूला एक विनम्र आदरांजली असेल......
MISS YOU ABU.....

Sunday, April 4, 2021

एकमेकांचे व्हा कायमचे!!!

ह्या दोघांची छोट्या पडद्यावरची chemistry अफलातून होती.परवा एका पुरस्कार सोहळ्यासाठी दोघे एकत्र अवतरले.खरे तर त्यांची अतिशय गाजलेली मालिका केंव्हाच संपली होती.या सोहळ्यात तर त्यांना नामांकनही नव्हते.पण सर्व आलेल्या आमंत्रितांपेक्षा हे दोघेच जास्ती "छाये हूवे" थे.
social media वर तर ह्यांच्या ह्या नव्या look ची, त्यांच्या एकत्र असण्याची बेफाट चर्चा चालू होती कारण होते तिने आपल्या Instagram account वर share केलेला त्या दोघांचा एक video.या सोहळ्यादरम्यान झालेल्या मुलाखतीत दोघेही एकमेकांबद्दल,त्यांना या मालिकेनिमित्ताने आलेल्या अनुभवांबद्दल भरभरून बोलले.दोघांच्या मैत्रीबद्दल विचारले असता त्याने त्याच्या नेहमीच्या सरळ आणि रांगड़या स्वभावाला अनुसरून "ही मैत्री आयुष्यभर अशीच राहील" असे सांगून टाकले.तिनेही सावधपणे का होईना पण त्याला हसत हसत "मम" म्हटले.पण तिनेच आपल्या"Instagram"वरच्या एका चित्राला दिलेल्या caption चाच वापर करून म्हणायचे तर "मुस्कुराते चेहरे,राज गेहेरे".
ही मालिका आता काही दिवसांपूर्वी मी पुन्हा एकदा ZEE5 APPवर बघितली.सलग नाही; पण "राणा-अंजली"चे काही निवडक प्रसंग म्हणा, एखादा Track आवडला म्हणून बघितला असे झाले. "दैनंदिन मालिका म्हणजे सिताफळ खाण्यासारखे असते. किती ही सांभाळून खायचे म्हटले तरी बरबट ही होतेच"- इति महान नट ॠषिकेश जोशी.
ह्या मालिकेचीही बरबट तर झालीच पण ही मालिका खूपच लोकप्रियही झाली.हे दोघे तर एव्हढे आपल्या भूमिकांमध्ये विरघळून गेले होते;जणू काही ही भूमिका त्यांच्यासाठीच लिहिली होती.पुढे पुढे तर हे दोघे अभिनय करतायत की खरंच एकमेकांच्या प्रेमात आहेत असे वाटावे इतकं या दोघांचे tunning जमलेले वाटत होते.दोघांची व्यक्तिमत्वेही त्या भूमिकेला पूरक होती.अगदी आदर्श जोडपे वाटावे अशी.त्यामुळेच की काय या दोघांनी वैयक्तिक आयुष्यातही एकमेकांची साथ द्यावी असेच या दोघांवर प्रेम करणाऱ्या त्यांच्या चाहत्यांना वाटले तर त्यात नवल ते काय?? आपण प्रेक्षक खूपच भाबडे असतो.नको नको म्हणत असताना पण एखाद्या मालिकेमध्ये, त्या व्यक्तिरेखांमध्ये गुंतत जातो मग हे असे होते.पण सगळेच प्रेक्षक काय भाबडे नसतात त्याना या व्यक्तिरेखांच्या अभिनयापलीकडचेही काही दिसत असतं.कारण दैनंदिन मालिकेमध्ये अशा अनेक जोड्या असतात. हजार हजार भाग करतात पण त्यांच्यामधले tunning, त्यांच्यामधली chemishtry पडद्यावर औषधालाही आढळून येत नाही. केवळ एखाद्याच्या बाबतीतच असे होते आणि त्यांच्याबाबतीत जेंव्हा प्रेक्षक असे म्हणू लागतात की या दोघांनी वैयक्तिक आयुष्यातही असेच एकत्र रहावे ही या जोडीवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांची नैसर्गिक प्रतिक्रिया असते.
अर्थात हे दोघेही स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्याबद्दल निर्णय घेणारे आपण कोण??? पण हे दोघे एकमेकांना शोभतात, पुरक वाटतात एवढे मात्र नक्की.
एक भाबडा प्रेक्षक म्हणून एवढे मात्र वाटते या दोघांनी त्यांच्या पडद्यामागील वैय्यक्तीक आयुष्यातही सदैव एकत्र राहावे....कायमचे...
#RanaDaAnjaliBaai
#HardeekAkshaya
#togetherforever
#BestCoupleInWorld

Friday, February 12, 2021

वात्सल्यमूर्ती कल्पवृक्ष

आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कल्पवृक्ष म्हणून एक काल्पनिक संकल्पना आहे हा कल्पवृक्ष म्हणजे असा एक वृक्ष असतो की त्याच्या पुढे उभे राहून कोणी काही मागितले तर त्याच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात आणि हा कल्पवृक्ष नेहमी आपल्या प्रेमाची, वात्सल्याची सावली आपल्या आश्रयास आलेल्या लोकांवर धरत असतो. गावडे घराण्याचा असाच एक वात्सल्यमूर्ती कल्पवृक्ष आज कायमचा कोमेजला!!!
गावडे घराणातल्या वरिष्ठ फळीमधली आम्हा सर्वांची लाडकी जयश्री आजी ,आमच्या विजय मामाची आई, सर्वाची लाडकी काकीचे आज निधन झाले.वात्सल्याचे कुठलं रूप असे जर आपण मनामध्ये त्याचं चित्र काढलं तर ते बहुतेक आमच्या आजीच्या रूपातच असावं.आपल्या वात्सल्यपूर्ण  प्रेमाची छाया तिने संपूर्ण कुटुंबावर गेली साठ वर्षे धरली होती. एक आदर्श गृहिणी तर होतीच पण त्याबरोबर ती एक आदर्श शिक्षिका ही होती. आदर्श शिक्षिका आणि नंतर मुख्याध्यापिका म्हणून एका प्रतिष्ठित शाळेतून निवृत्त झाल्यानंतर वानप्रस्थाश्रमही तिने खूप चांगल्या प्रकारे जगला असंच म्हणावे लागेल.सुगरण तर इतक्या वरच्या दर्जाची होती की तिने जेवताना वाढलेले पाणी ही चविष्ट लागायचे. तिच्या घरी गेल्यावर जेवणाचा आग्रह तो नेहमीचाच. तिच्या हातच्या जेवणाने पोट भरून जायचे पण मन भरायचे नाही. हस्ताक्षर तर एखाद्या छापील अक्षरापेक्षा सुंदर आणि रेखीव होते( तिच्या लाडक्या नातवामध्ये म्हणजेच देवाशिष मध्ये हा गुण अगदी अचूक उतरला आहे).
गावडे कुटुंबाच्या सुखात आणि दुःखात या कल्पवृक्षाची वात्सल्यपूर्ण सावली नेहमीच असायची. कुटुंबाच्या प्रत्येक समारंभात तर तिची हजेरी हे विशेष आकर्षण असायचे.अतिशय साधी पण आकर्षक वेशभूषा करून एखाद्या गर्भश्रीमंत संस्थानच्या महाराणीसारखी दिसणारी; पहिल्या रांगेत बसून शांतपणे सगळ्या कार्यक्रमाचा आनंद घेत बसलेली काकी आजी यापुढे दिसणार नाही याची चुटपुट यापुढे कायमची सगळ्यांना लागेल. अगदी आताआतापर्यंत तिला एवढा मोठे आजारपण आले असतानादेखील आपल्या नातवाच्या म्हणजे माझा चुलत मामेभाऊ विनितच्या लग्नात तिची हजेरी होती. या वात्सल्यमूर्तीने किती जणांना सांभाळले, त्यांना त्यांच्या पायावर उभे केले त्याची गणतीच नाही. त्यात सख्खे रक्ताचे तर होतेच पण सख्खे नसलेले जास्त होते. आजीने सर्वांना प्रेम, आपुलकी दिली. कधी कोणाकडून कसलीही अपेक्षा ठेवली नाही. त्यामुळेच तिचा प्रेमाचा गोतावळा एव्हढा मोठा आहे जो तिला या आयुष्यात तरी कधी विसरू शकत नाही. या दुष्ट आजारामुळे तीचे शेवटचे काही दिवस खूप कठीण गेले होते. गेले दोन दिवस तर ती अतिशय शांत झाली होती. समाधानी होती. कारण तिला कळलं होतं.असं कळणं आणि वास्तव स्वीकारणे फारच कमी लोकांना जमतं.जगाचा निरोपही तिने त्याच शांतपणे झोपेतच घेतला. कोणालाही त्रास न होऊ देता!!! आजी आज जरी तु आमच्यात नसलीस तरी तुझ्या आठवणींच्या रूपाने तू सदैव आमच्या मध्येच आहेस.....