Friday, February 12, 2021

वात्सल्यमूर्ती कल्पवृक्ष

आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कल्पवृक्ष म्हणून एक काल्पनिक संकल्पना आहे हा कल्पवृक्ष म्हणजे असा एक वृक्ष असतो की त्याच्या पुढे उभे राहून कोणी काही मागितले तर त्याच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात आणि हा कल्पवृक्ष नेहमी आपल्या प्रेमाची, वात्सल्याची सावली आपल्या आश्रयास आलेल्या लोकांवर धरत असतो. गावडे घराण्याचा असाच एक वात्सल्यमूर्ती कल्पवृक्ष आज कायमचा कोमेजला!!!
गावडे घराणातल्या वरिष्ठ फळीमधली आम्हा सर्वांची लाडकी जयश्री आजी ,आमच्या विजय मामाची आई, सर्वाची लाडकी काकीचे आज निधन झाले.वात्सल्याचे कुठलं रूप असे जर आपण मनामध्ये त्याचं चित्र काढलं तर ते बहुतेक आमच्या आजीच्या रूपातच असावं.आपल्या वात्सल्यपूर्ण  प्रेमाची छाया तिने संपूर्ण कुटुंबावर गेली साठ वर्षे धरली होती. एक आदर्श गृहिणी तर होतीच पण त्याबरोबर ती एक आदर्श शिक्षिका ही होती. आदर्श शिक्षिका आणि नंतर मुख्याध्यापिका म्हणून एका प्रतिष्ठित शाळेतून निवृत्त झाल्यानंतर वानप्रस्थाश्रमही तिने खूप चांगल्या प्रकारे जगला असंच म्हणावे लागेल.सुगरण तर इतक्या वरच्या दर्जाची होती की तिने जेवताना वाढलेले पाणी ही चविष्ट लागायचे. तिच्या घरी गेल्यावर जेवणाचा आग्रह तो नेहमीचाच. तिच्या हातच्या जेवणाने पोट भरून जायचे पण मन भरायचे नाही. हस्ताक्षर तर एखाद्या छापील अक्षरापेक्षा सुंदर आणि रेखीव होते( तिच्या लाडक्या नातवामध्ये म्हणजेच देवाशिष मध्ये हा गुण अगदी अचूक उतरला आहे).
गावडे कुटुंबाच्या सुखात आणि दुःखात या कल्पवृक्षाची वात्सल्यपूर्ण सावली नेहमीच असायची. कुटुंबाच्या प्रत्येक समारंभात तर तिची हजेरी हे विशेष आकर्षण असायचे.अतिशय साधी पण आकर्षक वेशभूषा करून एखाद्या गर्भश्रीमंत संस्थानच्या महाराणीसारखी दिसणारी; पहिल्या रांगेत बसून शांतपणे सगळ्या कार्यक्रमाचा आनंद घेत बसलेली काकी आजी यापुढे दिसणार नाही याची चुटपुट यापुढे कायमची सगळ्यांना लागेल. अगदी आताआतापर्यंत तिला एवढा मोठे आजारपण आले असतानादेखील आपल्या नातवाच्या म्हणजे माझा चुलत मामेभाऊ विनितच्या लग्नात तिची हजेरी होती. या वात्सल्यमूर्तीने किती जणांना सांभाळले, त्यांना त्यांच्या पायावर उभे केले त्याची गणतीच नाही. त्यात सख्खे रक्ताचे तर होतेच पण सख्खे नसलेले जास्त होते. आजीने सर्वांना प्रेम, आपुलकी दिली. कधी कोणाकडून कसलीही अपेक्षा ठेवली नाही. त्यामुळेच तिचा प्रेमाचा गोतावळा एव्हढा मोठा आहे जो तिला या आयुष्यात तरी कधी विसरू शकत नाही. या दुष्ट आजारामुळे तीचे शेवटचे काही दिवस खूप कठीण गेले होते. गेले दोन दिवस तर ती अतिशय शांत झाली होती. समाधानी होती. कारण तिला कळलं होतं.असं कळणं आणि वास्तव स्वीकारणे फारच कमी लोकांना जमतं.जगाचा निरोपही तिने त्याच शांतपणे झोपेतच घेतला. कोणालाही त्रास न होऊ देता!!! आजी आज जरी तु आमच्यात नसलीस तरी तुझ्या आठवणींच्या रूपाने तू सदैव आमच्या मध्येच आहेस.....

No comments:

Post a Comment