Wednesday, August 7, 2024

निवृत्ती

निवृत्ती....
एकदम  चितपरिचित शब्द.....पण प्रत्येकाची निवृत्तीची संकल्पना वेगळी असू शकते. एकाच कार्यालयात अक्खी कारकीर्द घडविल्यानंतर निवृत्त होताना देखील एखाद्या निवृत्तीधारकाला लहान मुलासारखे रडताना पाहिले आहे. माझ्या परिचित एका मित्राने मला सांगितले कि त्याने असे भविष्ययोजना करून ठेवली आहे कि वयाच्या चाळीशीत त्याला निवृत्त व्हायचे आहे आणि पुढे आपल्या छंदासाठी वेळ द्यायचा आहे....माझ्या मामीला  अकाली निवृत्ती घेतल्यानंतर काय करायचे हा प्रश्न पडला होता.एक साहेब निवृत्त होत असताना त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिवाळी साजरी केली होती.. गेला एकदाचा.... एक महान क्रिकेटर वयामुळे हालचाली मंदावल्यानंतरदेखील केवळ अट्टाहास म्हणून खेळत राहिला...अखेर त्याला सक्तीने निवृत्त हो...असे संकेत देण्यात आल्याचा इतिहास ताजा आहे. आपल्या वयाची नव्वदी गाठून देखील पदाचा मोह न सोडणाऱ्या राजकारण्यांबद्दल तर न बोललेलेच बरे . एका महान क्रिकेटरला तो अनेक विक्रम करत असताना,चांगला भरात असताना ,त्याने अचानक निवृत्ती का पत्करली  असे विचारले तेंव्हा त्याने फार छान उत्तर दिले. तो म्हणाला, "तुम्ही कारकिर्दीच्या  सर्वोच्च शिखरावर असताना जेंव्हा तूम्ही बाजूला होता,तेंव्हा तुमची निवृत्ती अनेकांना चटका लावून जाते... सतत रुख रुख लावून जाते ... का केले त्याने असे? असा विचार करायला लावते आणि तीच खरी निवृत्तीची गम्मत आहे...थांबण्याची हीच वेळ"
नमनाला एव्हढे घडाभर तेल ओतण्याचे कारण मागच्या आठवड्यातली अशीच एक चटका लावणारी  निवृत्तीची घोषणा... तीन वेळा सर्वोत्कृष्ठ अभिनेता विभागात ऑस्कर पुरस्कार मिळवणारा ब्रिटिश कलाकार डॅनिएल डे लुईस याने वयाच्या साठाव्या वर्षी अभिनयाच्या प्रांतातून पत्करलेली निवृत्ती.तीन वेळा सर्वोत्कृष्ठ अभिनेता विभागात ऑस्कर पुरस्कार मिळवणारा ऑस्करच्या इतिहासातला तो एकमेव अभिनेता आहे . गेली ४ दशके  अभिनय क्षेत्र गाजवणारा,या क्षेत्रात येणाऱ्या अपरिहार्य मोहांना बळी ना पडलेला आणि आपले खाजगी आयुष्य कमालीचे जपणारा एक महान अभिनेता. त्याच्या कारकिर्दीकडे जर नजर टाकली तर खरेच अचंबित व्हायला होते. १९७० साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या या अभिनेत्याने आपल्या ४ दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत केवळ २० चित्रपटांतून काम केलेय आणि यादरम्यान त्याला ४ वेळा ऑस्कर नामांकने (त्यात ३ वेळा पुरस्कार प्राप्त), ५ वेळा गोल्डन ग्लोब नामांकने(२वेळा विजेता ),४ वेळा बाफटा  नामांकने(२ वेळा विजेता) अशी भरीव कामगिरी.हा अभिनेता नाट्यक्षेत्रातही "दादा" होता,ते क्षेत्रही त्याने चांगलेच गाजवले आहे . चित्रपटांच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्याने साकारलेल्या माय लेफ्ट फूट मधील अपंग ख्रिस्टी ब्राउन,द लास्ट ऑफ द मोहिकंस मधील लढवय्या "हॉक आय " नाथनेल पो,महान दिग्दर्शक  मार्टिन स्कॉर्सेझी यांच्या "गँग्स ऑफ न्यूयॉर्क"मधला एका अनाथ मुलीवर(कॅमरॉन डीआझ ) मनापासून पोटच्या मुलीसारखे  प्रेम करणारा पण तिचे ज्याच्यावर प्रेम आहे त्या विरुद्ध गॅंगच्या नेत्याच्या (लिओनार्दो डी कॅप्रिओ ) जीवावर उठलेला क्रूरकर्मा एकाक्ष बिल "द बुचर ",प्रयोगशील दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन याच्या "देअर विल बी ब्लड" मधला कमालीचा व्यवहारी पण तितकाच हळवा पिता असलेला तेलखाणीचा मालक डॅनियल प्लान्व्हिऊ आणि ज्या भूमिकेसाठी त्याला ३ऱ्यांदा ऑस्कर मिळाले तो ख्यातनाम दिग्दर्शक स्टिव्हन स्पीलबर्ग यांच्या अमेरिकेचे महान माजी अध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा त्याच नावाचा जीवनपट "लिंकन "मधील अब्राहम लिंकन या त्याच्या भूमिका चित्रपट रसिकांच्या मनात कायम कोरल्या गेल्यात.आपण साकारत असलेल्या भूमिकेत परकायाप्रवेश केल्याप्रमाणे शिरणे ही या अभिनेत्याची खासियतच म्हणावी लागेल  आणि तसे त्याच्या भूमिकेचे आणि त्याचे अद्वैत चित्रपटरसिकांनी नेहमीच अनुभवले आहे. "माय लेफ्ट फूट "मधील अपंग साकारताना तो इतका तन्मय झाला होता की त्याला त्या मनोभूमिकेतून बाहेर काढायला एक मनोचिकित्सक चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या ठिकाणी नेहमी हजर असायचा. लिंकन  चित्रपटासाठी  भूमिकेच्या तयारीसाठी त्याने लिंकनवरची १००च्यावर पुस्तके वाचून काढली,लिंकनसारखे दिसावे म्हणून रंगभूषाकारांसोबत अनेक वेळा चर्चा केली,लिंकन जोवर आत्मसात करत नाही तोवर चित्रीकरणासाठी येणार नाही असे सांगितले आणि त्यावर ठाम राहिला. ज्याची पोचपावती  त्याला ऑस्करच्या रूपाने मिळाली . त्यावर्षी डेन्झेल वॉशिंग्टन ,ब्रॅडली कूपर ,ह्यू जॅकमन ,जॉकीन फिनिक्स अशी  तगडी स्पर्धा  असताना देखील डॅनियल ने बाजी मारली. त्याला ऑस्कर देण्यासाठी मंचावर आलेली महान अभिनेत्री मेरील स्ट्रीप हिने तिला दिलेले विजेत्याचे नाव लिहिलेले पाकीट उघडण्याचीदेखील तसदी घेतली नाही इतकी तिला खात्री होती कि विजेता डॅनिएलच असणार . ज्यांनी लिंकन बघितलाय त्यांना भूमिकेशी तादात्म्य पावणे काय असते ते डॅनिएलच्या अभिनयातून नक्कीच अनुभवले असणार.त्याचा शेवटचा चित्रपट १९७० सालातल्या ब्रिटनमधील फॅशन इंडस्ट्रीवर बेतलेला "फँटम थ्रेड" हा आहे  आणि तो पुढच्यावर्षी ऑस्कर स्पर्धेत असेल हे नक्की,असा हा महान अभिनेता. नुकतीच  त्याला "सर "हि पदवी बहाल करण्यात आलेली आहे.

कुडतरकर लक्ष्मी ५०

वीस हून अधिक वर्षे झाली असतील; ती आमच्या कुटुंबाचा भाग झाली. दिसायला अगदी चारचौघींसारखीच.थोडीशी मान कलती ठेवून उभी राहणारी . कोकणातल्या वेंगुर्ला तालुक्यातल्या तुळस ह्या अगदी छोट्याश्या पण निसर्गाची आणि मत्स्यसंस्कृतीची जोड लाभलेल्या गावातून मुंबईत आलेली . चार  सालस बहिणी आणि एक  भाऊ, आई ,वडील असा कुटुंब कबिला. आई  साधीभोळी ,वडील देवमाणूस. रस्त्यातून चालतानाही नजर वर न करता चालणारे सरळमार्गी . चेंबूरच्या मराठी बहुल टिळक नगर मध्ये अनुभवलेले लहानपण बरेच काही देऊन गेले .मराठी वातावरण असल्याने  मराठी सण ,परंपरा लहानपणापासूनच मनावर  बिंबलेल्या ,व्यक्तिमत्वाचाच एक भाग झालेल्या . जात्याच हुशार असल्याने शिक्षणात कसलाही अडथळा आला नाही,कर्तव्यदक्ष वडिलांनी  तुटपुंज्या पगारात सर्व लेकरांचे शिक्षण व्यवस्थित केले .शिक्षण चांगले असल्याने नोकरी ही चांगली आणि पट्कन मिळाली. 
तर असे चांगले संस्कार,चांगले  शिक्षण नोकरी, चाळसंस्कृतीत वाढल्याने जुळवून घ्यायची,सर्वाना एकत्र करून राहण्याची वृत्ती अशा बर्याच चांगल्या गुणांची शिदोरी अन आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन ती सुचिता शिवराम सावंत ची ...ची.सौ.कां सुचिता उदय कुडतरकर होऊन कुडतरकर घराण्यात प्रविष्ठ झाली. हे सावंतवाडीचे कुडतरकर म्हणजे तसे प्रतिष्ठित घराणेच. एक तर हे आमचे तीनही बंधू कमालीचे देखणे आणि सर्व गुणसंपन्न . तितकेच मनस्वीही आणि हट्टीही. तिचा ज्याच्याशी पाट लागला ते आमचे सर्वात मोठे बंधुराज तर गायन,चित्रकला,खेळ(वायफळ खरेदी इत्यादि ) अशा अनेक कलांमध्ये पारंगत,अभ्यासात ही कमालीचे हुशार. पण त्याच बरोबर कलाकार असल्याने अत्यंत मनस्वी आणि अगदी लहान मुलासारखे खट्याळ . अशी माणसे प्रवाही पाण्यासारखी असतात. त्यांना मायेचे, धाकाचे कुंपणाची गरज असते असे कुंपण जे त्यांच्या प्रतिभेला साथ देईल आणि प्रसंगी कठोर होवून त्यांना योग्य प्रसंगी रोखून ही धरेल. हे काम गेली वीस वर्षांहूनही अधिक काळ ती करत आहे. सर्व नात्यांचे महत्व जाणून आहे त्यांना योग्य तो मान देत आली आहे. आज वयाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे होत असताना तिला आनंद तर होत असेलच पण या दिवसाच्या पूर्वसंध्येला  मागे वळून बघताना या घरात अनुभवलेले बरे वाईट प्रसंगांचा ,अनुभवांचा कॅलिडोस्कोप तिच्या डोळ्यांसमोर असेल ,चांगला अनुभव आनंद देऊन गेला तर वाईट अनुभव काही तरी शिकवून गेला असेच तिला वाटत असेल हे नक्की . जीवन नगर मधल्या त्या वन रुम किचन घरात नवरा,त्याचे दोन भाऊ सासू सासरे एव्हढी मंडळी असून देखील गुण्या गोविंदाने केलेला संसार आठवत असेल तिला. तिच्या दोन्ही मुलांचा जन्म,त्यांच्या लहानपणीच्या गोड आठवणी आठवत असतील. एव्हढं मोठे कुटुंब असल्याने भांड्याला भांडे लागलेही असेल, पण त्यामुळे त्या भांडयांना पोचा पडणार नाही याची दक्षता नेहमीच घेत आलीय ती. 
तशी ती फारशी रागवत नाही. पण कधीतरी कुणावर राग ही आला असेल.अशा प्रसंगी माहेरच्या आठवणीने हळवी ही झाली असेल ते आठवेल. सायकल साठी हट्ट धरून बसलेल्या १४ वर्ष्यांच्या टोणग्या दिराला समजवता,समजवता नाकी नऊ आले होते तिच्या आणि दादाच्या. पोटच्या पोराप्रमाणे असलेल्या त्या वांड कार्ट्याला मायेने,प्रेमाने स्वत:च्या हाताने भरवले होते तिने. स्वकमाईने घेतलेले काल्हेरचे घर आठवत असेल तिला आणि आज मुलुंडमध्ये तीन खोल्यांचे स्वमालकीचे घर समाधान देत असेल.अति काळजी करते ,नेहमी कामाच्या गडबडीत असते,सारखी मुलांच्या मागे असेही तिला बर्याचदा म्हटले गेले पण तिने कधीच त्याला प्रत्युत्तर केले नाही.हसून ते सहन करत आली. ती आली आणि माझी प्रगती झाली असे आमचे बंधुराज म्हणतात ते उगीच नाही. सर्व कुटुंबाला एकत्र धरून ठेवण्याचे काम माझ्या तीनही वहिन्यांनी केलेय  त्यातही ही सर्वात ज्येष्ठ असल्याने हिची जबाबदारी कांकणभर जास्तच. लक्ष्मीच्या पावलांनी ती आली आणि कुटुंबात अशी मिसळून गेली जणू दुधात साखर . मुलांवरही खूप चांगले संस्कार आहेत.दोन्ही मुले अत्यंत हुशार आणि प्रेमळ आहेत (खरे तर आमची सर्व पुतणे मंडळी गोड आहेत). वयाची पन्नाशी असली की तिला सुवर्णमहोत्सवी वर्ष असे म्हणतात. आज आमची सुचिता वहिनी आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करतेय. सुवर्ण भट्टीत टाकले की त्या आगीने त्याला अजूनच झळाळी येते; ते त्याच्या गर्भित तेजाने उजळून निघते.त्याचप्रमाणे संसाराच्या भट्टीत आपल्या आयुष्याचे सोने अर्पण केल्याने  आपल्या कुटुंबियांच्या प्रति असलेल्या समर्पण भावनेच्या ,कर्तव्याच्या,प्रेमाच्या गर्भित तेजाने वाहिनीचे सुवर्णरूपी व्यक्तिमत्व अधिकच झळाळून उठले आहे आणि तिच्या गर्भित उबदार मायेची पखरण तिच्या सुहृदांवर सदैव होत राहील याची मला खात्री आहे. या वयपरत्वे अधिकच तेजस्वी होत चाललेल्या व्यक्तिमत्वाचा आज सुवर्णमहोत्सवी वाढदिवस . वहिनी तुझी आजवरची वाटचाल स्तंभित करणारी आहे .यापुढेही तुझी अशीच यशस्वी वाटचाल होवो . तुला उदंड आयुष्य लाभो .तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच स्वामीचरणी प्रार्थना....

निरोप

शेवटी ती वेळ आली.... तुला निरोप देण्याची!!
साधारण २५ वर्षांपूर्वी तू आमच्या आयुष्यात आलास; म्हणजे माझ्या वडिलांनी तुला आमच्या आयुष्यात आणलं.
आईचा वाढदिवस होता... वडिलांना आईला काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं आणि या गिफ्टच्या रूपाने तू आमच्या घरी आलास . छान होतास!! METALIC GREY रंगाचा,व्यवस्थित थंड होणारा, ज्या,ज्या गोष्टी आम्हाला तुझ्या पोटात ठेवाव्याश्या वाटल्या त्या आपल्या पोटात ठेवून त्यांना COOL राहून सांभाळणारा .अगदी हल्ली हल्लीपर्यंत  तुझा हा इमानीपणा तू सोडला नव्हतास. पण आजकाल कुठेतरी तुझ्यातला तो COOLNESS हरवायला लागला होता. कधीतरी तू अतिशय थंड व्हायचास, कधी आतल्या आत खूप रडायचास, तुझा दरवाजा उघडला की सगळं पाणीच पाणी. कधीतरी स्वतःला बंदच करून घ्यायचास. मग तुझ्यासाठी तुझा डॉक्टर बोलावला की तो तुला थोडासा दुरुस्त करून परत आमच्याकडे सोपवायचा; पण अलीकडे तुझं दुखणं खूपच वाढलेलं आणि मग आमच्या लक्षात आलं की तुझं वय झालंय.तुला बदलण्याची वेळ झालीय. खरंच कठीण होता हा निर्णया आमच्यासाठी. कारण तू एक निर्जीव वस्तू जरी असलास तरी आमच्या घरातला एक भाग होतास. गेली २५ वर्षं तू आम्हाला ईमाने इतबारे सेवा दिली होतीस.
या घरातली किती स्थित्यंतरे तू पाहिलीस.माझं लग्न,माझ्या वडिलांचा मृत्यू, अवंतीचा जन्म आणि तिचं बालपण! कोरोनाकाळात तर आमच्यासाठी देवदूत होतास तू!!! हे सारे तू पाहिलेस त्यामुळे नकळतपणे तुला निरोप देताना आम्ही सारेच भावूक झालोय. विषेशतः माझी आई!!  तुला नियमितपणे स्वच्छ ठेवणं. तुझी काळजी घेणं,तू बिघडलास की माझ्या खनपटीला बसून तुझा डॉक्टर बोलायला सांगणं. हे सगळं माझ्या आईने निगुतीने केलं. पण आम्हालाही समजत होतं तुझी वेळ आता जवळ आलीय त्यामुळेच तुझाच जातकुळीतला पण थोडा वरच्या दर्जाचा तुझा भाऊ आम्ही आता आमच्या सेवेत घेतलाय; त्याला तुझ्या आशीर्वाद असू दे. उद्या तू आमच्या घरातून कायमचा जाणार हे ऐकल्यावर केवळ आम्हीच नाही तर तुझ्याबरोबर फक्त साडेचार वर्षांची  ओळख असलेली माझी लेकही भावूक झाली होती. उद्या कंपनीवाले तुला येऊन घेऊन जाणार आणि मग तुझ्याबरोबर काय होईल माहित नाही;पण आता तुझ्यासाठी एकच सदिच्छा की तुला पुन्हा नवा रंग रूप देऊन त्यांनी आमच्यासारख्याच कोणाच्या तरी चांगल्या माणसांच्या हातात तुला द्यावं आणि तू आमची केलीस तशीच सेवा त्यांचीही करावीस हीच तुझ्या मित्राची तुला शुभेच्छा....
Good BYE  "SAMSUNG REFRIGERATOR "
तू दिलेल्या पंचवीस वर्षाच्या अखंड सेवेबद्दल तुझे खूप खूप आभार.........

अलविदा

Monday, October 17, 2022

लाल सिंग चढ्ढा


"लाल सिंग चढ्ढा":एक नितांत सुंदर अनुभव

चित्रपट हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आणि व्यक्त होण्याचे एक प्रभावी माध्यम आहे असे मला वाटते.आपल्या आजूबाजूला होणाऱ्या घटनांचा प्रभाव चित्रपटावर पडत असतो आणि तो चित्रपटाच्या माध्यमातून व्यक्त होत असतो पण कधी कधी याच्याबरोबर उलट होतं. चित्रपटाशी संलग्न गोष्टींचा व्यक्तींचा समाजावर (चुकीचा) प्रभाव पडतो आणि मग त्या चित्रपटाला त्याचे परिणाम भोगावे लागतात.एका चांगल्या कलाकृतीची हानी होते. चित्रपट कला ही जरी समाजाभिमुख असली तरी चित्रपट हा एक स्वतंत्र विषय आहे असं मला वाटतं. ज्यामध्ये एखाद्याला आपली कला सादर करण्याचा आपल्या विचारांनी व्यक्त होण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण दुर्दैवाने असं होत नाही.हे सगळं मी बोलतोय कारण अशाच परिणाम भोगलेल्या एका चित्रपटाचा OTT वर पुनर्जन्म झाला आणि तो चित्रपट म्हणजे "लालसिंग चढ्ढा".
हा चित्रपट याच वर्षी 11 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित झाला (त्याच्याभोवती असलेल्या वादाबद्दल मला काही बोलायचं नाहीये पण एक स्वतंत्र चित्रपट म्हणून लाल सिंग चड्डा हा एक नितांत सुंदर अनुभव आहे एवढं मात्र नक्की.) लगेचच पडला.बऱ्याच लोकांना तो दुर्बोध वाटला. ९०% लोकांनी त्याची तुलना ज्या चित्रपटावर तो बेतला आहे त्या  "FOREST GUMP" या चित्रपटाशी केली म्हणूनही असेल किंवा दुसरी अनेक (चुकीची) कारणे असतील पण हा चित्रपट सिनेमागृहात चालला नाही किंवा मुद्दामून त्याला पाडण्यात आले माहित नाही. पण आता "OTT PLATFORM" वर हा चित्रपट प्रचंड गाजतो आहे आणि घरी बसून शांतपणे ज्यांनी हा चित्रपट बघितला त्यांना आता समजतंय की केवढी मोठी चूक केली.( आणि आता मोठ्या संख्येने लोक या चित्रपटाबद्दल मनापासून व्यक्त होत आहेत).
पहिल्यांदा या चित्रपटाबद्दल थोडेसे!!! "लालसिंग चढ्ढा" हा नव्वदीच्या दशकामध्ये आलेल्या "FOREST GUMP" या चित्रपटाचा REMAKE आहे म्हणजेच पुनरावृत्ती आहे.
"ERIK ROTH" या पटकथाकाराने अमेरिकी इतिहासात घडलेल्या कालातीत घटनांचा संदर्भ घेऊन एक बांधेसूद पटकथा बनवली ज्याला "ROBERT ZEMECKIS"सारख्या सर्जनशील दिग्दर्शकाची जोड मिळाली आणि "TOM HANKS" या मातब्बर अभिनेत्याने या चित्रपटातील प्रमुख भूमिकेचे सोने केले होते. त्या वर्षीच्या ऑस्कर सोहळ्यातही या चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावत आपली छाप सोडली होती.या चित्रपटाची पुनरावृत्ती करण्याचे शिवधनुष्य उचलणे हीच एक स्वतःमध्ये फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं आणि हे शिवधनुष्य लीलया आमिर खान प्रोडक्शन्स,आमिर खान स्वतः,अद्वैत चंदन; या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि या चित्रपटाची पटकथा ज्यांनी लिहिली ते अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी लिलया पेलले आहे असे मला वाटते. मुळात एखाद्याने आधीच जर असं हिमालयासारखं कर्तृत्व करून ठेवलं असेल तर त्याला समांतर अशी पटकथा लिहिणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे.अतुल कुलकर्णी यांनी ते शक्य करून दाखवले आहे. निव्वळ अप्रतिम पटकथा!!! भारतीय इतिहासातील घडून गेलेल्या काही घटनांचा संदर्भ घेऊन त्या "लाल"च्या आयुष्यभराच्या प्रवासात अत्यंत खूबीने पेरून बांधीव अशी पटकथा अतुल कुलकर्णी यांनी तयार केली त्याबद्दल त्यांना शंभर पैकी शंभर मार्क.अद्वैत चंदन या तुलनेने नवख्या दिग्दर्शकाने अतुलजींच्या पटकथेला योग्य न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे नव्हे तो 100% यशस्वी झालाय असेच मी म्हणेन आणि अद्वैतच्या या प्रयत्नांना चित्रपटातल्या तगड्या कलाकारांची योग्य साथ मिळाली आहे.करीना कपूर खान हिने साकारलेली "रूपा डिसूजा" अप्रतिम आहे तीच गोष्ट बाला झालेल्या चैतन्य अकीनेनी या तेलुगु अभिनेत्याची. मानव वीज यांनी साकारलेला मोहम्मद हा पाकिस्तानी सैनिक लक्षात राहतो आणि आमिर खान बद्दल काय बोलायचं.आत्ममग्न असलेला,प्रेमाचा भुकेला,सरळमार्गी लालसिंग चढ्ढा आमिरने ज्या ताकदीने उभा केलाय त्याला तोड नाही.अमीर ही भूमिका जगलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि हे असं आमिरच्या प्रत्येक भूमिकांच्या बाबतीत म्हणता येईल. उदाहरणच घ्यायचं झालं तर 'दंगल'मधला त्यांनी उभा केलेला महावीर सिंग फोगाट बघा METHOD ACTINGचा तो एक अप्रतिम नमुना आहे.(या भूमिकेसाठी आमिरने वजन वाढवलं,कुस्ती शिकली तरी त्यावर्षी सर्वोत्तम अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार आमिरला डावलून अक्षय कुमारला त्याच्या "रुस्तम" या सुमार चित्रपटातल्या टुकार भूमिकेसाठी देण्यात आला होता. असो!!!) या चित्रपटातलं त्याचं आत्ममग्न बोलणं,डोळे मिचकावणं या लकबी लोकांना खटकू शकतात. पण आत्ममग्न लोक अशीच असतात;त्यामुळेच ती दुसऱ्यांना थोडीशी वेडी वाटतात पण खरं तर ती तशी नसतात."लाल"च्या मनात चाललेली भावनाची आंदोलनं आमिरने अवघ्या देहबोलीतून इतक्या ताकदीनं व्यक्त केली आहेत त्याला तोड नाही. निव्वळ अप्रतिम!!! आमीर काय ताकदीचा अभिनेता आहे हे जर बघायचं असेल तर या चित्रपटातला तो आपल्या मुलाला भेटतो त्याप्रसंगी व्यक्त झालेला अमीर बघा मग तुम्हाला कळेल मी काय म्हणतो ते.....
तांत्रिकदृष्ट्याही चित्रपट कमाल आहे.सेतू यांचं छायाचित्रण आणि प्रीतम यांचे म्युझिक चित्रपटाला अनुरूप असेच आहे. एकूणच काय एक नितांत सुंदर चित्रपट बघायचा असेल तर "लालसिंग चढ्ढा" जरूर बघावा फक्त आपले पूर्वग्रहाचे चष्मे बाजूला काढून हा चित्रपट बघा एक नितांत सुंदर अनुभव नक्की मिळेल तुम्हाला!!!
"लालसिंग चढ्ढा" आता "NETFLIX"वर प्रदर्शित झाला आहे.

अमित अशोक परब
@amitashokparabofficial

Saturday, October 1, 2022

अभिष्टचिंतन

प्रिय उदय दादा, 

सप्रेम नमस्कार, 

आज तुझ्यासाठी खास दिवस आहे आणि याप्रसंगी तुला एका अलिखित वैश्विक सत्याची आठवण नक्कीच झाली असावी. माणसाला आपले पहिले प्रेम कधीच विसरता येत नाही आणि ते ज्या क्षणी त्याच्यापासून दूर जाते तो क्षण फार त्रासदायक असतो.आपण कितीही स्थितप्रज्ञतेचा आव आणला तरी मन भरून येते,डोळे झरू लागतात,सगळ्या जुन्या आठवणींची रिळं एकामागून एक मनाच्या पटलावर चालतात.तुझ्यासाठी फारच भावनिक क्षण असेल तो.... नक्कीच!!!
आज तुझे पहिलं प्रेम,तुझी कंपनी,ज्या कंपनीमध्ये ( तुझ्या आजच्या वयाच्या हिशेबाने) जवळजवळ आपलं अर्ध्याहून अधिक आयुष्य व्यतीत केलंस,त्या "LARSEN & TOUBRO" कंपनीच्या मोठ्या पदावरून तू सेवानिवृत्त होतोयस..
खरंतर सेवानिवृत्ती ही सुद्धा एक नवीन सुरुवात असते.पण प्रत्येकाला असं "पुनःश्च हरी ओम्" करणं जमत नाही.त्या कंपनीशी, तिथल्या माणसांशी ऋणानुबंध जुळलेले असतात.त्या सर्व वातावरणाची सवय जडलेली असते;नव्हे तो आपल्या जीवनशैलीचाच एक भाग झालेला असतो.म्हणून जेंव्हा केंव्हा असा प्रसंग वाट्याला येतो तेंव्हा ते कटू वास्तव स्वीकारणं बऱ्याच जणांना जड जाते.निवृत्तीपश्चात अशी माणसं मग उगीचच कटू आणि कटकटी बनतात.त्यात तू  "L & T"मधील "HEAVY MACHINE SHOP"मध्ये कामाला!!! त्यामुळे आजूबाजूला असलेले रूक्ष धातू आणि विविध वाणाच्या मशीनींच्या सानिध्यात बराच काळ असलेल्या माणसाला त्यांचा गुण लागायची शक्यता असते पण तुझ्या बाबतीत असं काही घडायची सुतराम शक्यता दिसत नाही. कारण तुझी रसिक कलाकारवृत्ती आणि तू जोपासलेले छंद.
                        तू एक चांगला गायक आहेस,फार वरच्या दर्जाचा चित्रकार-छायाचित्रकार आहेस,इंग्रजी भाषेवर तुझे प्रभुत्व आहे;या साहेबाच्या भाषेत तू केलेले लिखाण वाचनीय असते.शिवाय तुझ्या मनातला नवीन हळवा कोपरा,तूझे कोकणातले टुमदार घर "अद्वैत" आहेच.त्यामुळे आमच्यासारख्या तुझ्या सुह्रुदांना तू सेवानिवृत्त झाल्यावर काय करणार याची चिंता नाही.
                 आपल्या तारुण्यात तू एक चांगला फलंदाज म्हणूनही लोकप्रिय होतास.आपले जुने घर,मुलुंड(पूर्व)ला असलेल्या जीवन नगर सोसायटीच्या स्थानिक क्रिकेट सामन्यांमध्ये तू लगावलेले षटकार अजूनही लोकांच्या लक्षात आहेत;त्यामुळे या तुझ्या 2ND INNINGमध्येही तू चांगली बॅटिंग करशील याची खात्री आहे.
निरोपाचे भाषण करताना आपल्या घरच्यांचे आणि सुह्रुदांचे आभार मानायचे शास्त्र असते,ते जरूर पाळ.कंपनीत २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल कंपनीकडून मिळालेले घड्याळ नक्की घाल आणि जर भावना अनावर झाल्या तर मोकळ्या मनाने अश्रूंना वाट करून दे.तिथे उगीचच स्थितप्रज्ञतेचा आव आणू नकोस.
दादा तू त्या भावनिक पिढीचा प्रतिनिधी आहेस ज्यांनी मिळालेली नोकरी आणि जिच्याशी लग्न झालं त्या छोकरीशी आयुष्यभर इमाने इतबारे निभावलं.अंगावर आलेल्या सर्व जबाबदाऱ्या खंबीरपणे पेलल्या.भाऊ,मित्र,मुलगा,पिता अशी नातीही मनापासून जपली. 
सुचिता वहिनीचे आभार मानायला विसरू नकोस,कारण तुझ्या आजवरच्या गृहस्थाश्रमाच्या प्रवासामध्ये तिची खंबीर साथ तुला होती,आहे आणि या पुढेही असणार आहे.
तुझ्या या सन्मानजनक निवृत्तीबद्दल उदय दादा तुझं अभिष्टचिंतन!!! आणि तुझी आतुरतेने वाट बघणार्या तूझ्या 2ND INNINGसाठी तुला डोंगराएवढा शुभेच्छा!!! 

तुझा लाडका भाऊ 

अमित

Sunday, September 18, 2022

अंतिम क्षण


झाडावरून ओघळणाऱ्या फुलासम
माझा अंतिम क्षण असावा
हे जग सोडून जात असताना
कसलाही आवाज न व्हावा

अमित अशोक परब 


सध्या पितृपंधरवडा चालू आहे आणि माझ्या वडिलांचा आज दिवस आहे. त्यानिमित्ताने सुचलेली ही चारोळी.👆
माझ्या वडिलांची शिकवण,त्यांचं प्रेम आणि इतरही अनेक 
त्यांच्या चांगल्या गोष्टी जश्या आयुष्यभर माझ्या लक्षात राहतील तसाच कायम स्मरणात राहील त्यांचा अंतिम क्षण!!!! कारण तो झाडावरून ओघळणाऱ्या फुलासारखा होता.
झाडावरून जेव्हा एखादं फुल ओघळतं तेव्हा त्याचा कसलाही आवाज होत नाही आणि त्यामुळे ते ओघळल्याचे समजतही नाही.तसंच काहीसं झालं.
पप्पांना सुपारीच्या खांडाचेही व्यसन नव्हतं.तरुण वयात अंगमेहनतीची काम केल्यामुळे आणि व्यायामाची मुळातच आवड असल्यामुळे वयाची साठी ओलांडल्यानंतरही त्यांची प्रकृती वर्धिष्णू होती. पण २४ मे २०१८चा तो दिवस आणि तो क्षण चुकला नाही.कसल्याही मोठ्या आजारपणाचा सामना करावा लागला नाही वा अंथरुणात पडून राहावं लागलं नाही.स्वतःला आणि दुसऱ्यालाही नकोसं असणारे म्हातारपण त्यांच्या नशिबात आलं नाही.शांतपणे झोपेतच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.असा अंतिम क्षण ज्याच्या नशिबात त्याला पुण्यवान माणूस असं म्हणतात.आज हे सगळे विचार मनात डोकावत असताना क्षणभर वाटून गेलं माझ्याही नशिबात असा अंतिम क्षण असेल काय?बहुदा नसावा!! कारण तेवढं पुण्यही गाठीशी असावं लागतं.........😔



Thursday, August 12, 2021

अण्णा पन्नाशी

मी माझ्या आई-वडिलांचा एकुलता एक!!! मला सख्खे भावंडं नाही.पण मला माझ्या नात्यातल्या भावंडांचे खूप प्रेम लाभले आहे.त्या बाबतीत मी खूपच भाग्यवान आहे.त्यातही माझ्या सख्ख्या आत्येभावांचे म्हणजे तीनही कुडतरकर बंधूंचे प्रेम मला जरा जास्तच लाभले आहे.माझे सख्खे भाऊ वाटावेत असे हे तिघे. याच माझ्या तीन भावांपैकी सर्वात धाकट्या पातीचा म्हणजे माझ्या अजित अण्णाचा आज सुवर्ण महोत्सवी अर्थात ५०वा वाढदिवस.
मी त्याला "अण्णा" अशी हाक का आणि कधी मारायला लागलो मलाच माहीत नाही. (पुढे जाऊन तो दक्षिण भारताचा जावई होणार आहे असं मला कुठेतरी दिसलं असावं म्हणून असेल कदाचित!!! दक्षिण भारतीय लोक मोठ्या भावाला "अण्णा" म्हणतात म्हणून मी त्यालाही अण्णा म्हणायला सुरुवात केली असावी.) खरं तर त्याला अण्णा म्हटलेलं अजिबात आवडायचं नाही.तो नेहमी मला दरडावून सांगायचा "ए मला अजित म्हण!! "अण्णा" म्हणून हाक मारू नकोस!!!" मग मी पण मुद्दाम तो चारचौघात विशेषतः त्याच्या खास मित्रांच्या गोतावळ्यात असला की त्याला चिडवायला लांबून त्याला "अण्णा" म्हणून हाक मारायचो. सुट्टी पडली की मामाच्या गावाला जाऊया असे आपल्या लहानपणी म्हणायचे माझ्या बालपणीतल्या बहुतेक सुट्ट्या ह्या मुलुंडला माझ्या आत्याच्या घरी जीवन नगर सोसायटीत गेल्यात. माझा सर्वात मोठा दादा उदय माझे सर्व लाड पुरवायचा.दोन नंबरचा भाऊ ऋतुराज माझी खूप काळजी घ्यायचा.पण अण्णा माझा यार होता. खेळातला सवंगडी होता.त्याचे कितीतरी क्रिकेटचे सामने मी केवळ प्रेक्षक म्हणून बघायला जायचो.त्याची गोलंदाजी इतकी भन्नाट होती की त्याच्या गोलंदाजीला त्याच्या एरियातले तत्कालीन भले भले फलंदाज घाबरायचे.भन्नाट वेगाने चेंडू टाकणारा सहा फूट उंच माझा अण्णा पाहणे म्हणजे एक पर्वणी असायची आणि आपल्या पहिल्याच षटकात समोरच्या संघातला गडी बाद करण्यात त्याचा हातखंडा होता.त्या क्षेत्रात पुढे गेला असता तर तो खरंच एक नावाजलेला गोलंदाज झाला असता यात काही शंकाच नव्हती.पण त्याने वेगळे क्षेत्र निवडले.त्यातही आपल्या मेहनतीच्या आणि चिकाटीच्या जोरावर तो आज खूप मोठ्या पदावर आहे.
त्याचा जन्म १३ तारखेचा!! तेरा ही अशुभ तारीख समजली जाते. पण आपल्या कर्तृत्वाने अण्णाने ही तारीख किती शुभ असू शकते हे सिद्ध करून दाखवले आहे.तीन भावंडांत तो सर्वात धाकटा!!! पण या तिन्ही भावंडांमध्ये बऱ्याच बाबतीत त्याने पहिला नंबर लावला आहे. मुंबईच्या बाहेर नोकरी करायला गेलेला या तीन भावांतला तो पहिला.नोकरीनिमित्ताने परदेशवारी करणाराही पहिला तोच आणि या तीन भावंडांपैकी चार चाकी गाडी घेणाराही तोच पहिला.
असं म्हणतात की नशीब हे कर्तुत्ववान माणसालाच नेहमी साथ देते.आयुष्यभराचं जोडीदार हा चांगला मिळणे हा सुद्धा एक नशिबाचाच भाग असतो.त्याबाबतीत अण्णा खरंच नशीबवान आहे की दिव्या वहिनीसारखी साक्षात लक्ष्मी त्याच्या आयुष्यात आली.आता त्यांच्या आयुष्यात "अध्यन"चाही प्रवेश झाला आहे.अण्णाच्या मुळच्या भ्रमरवृत्तीमुळे,मनस्वी स्वभावामुळे त्याचे कसे होणार??? अशी त्याच्या आईला म्हणजे माझ्या सुहासिनी(मंदा)आत्याला नेहमी काळजी असायची.त्याच आमच्या अण्णाला आज एक उच्चपदस्थ अधिकारी ,उत्तम गृहस्थ, एक अतिशय चांगला पिता आणि प्रेमळ नवरा अश्या विविध भूमिकांमध्ये सहज वावरताना बघून आत्याला खूप आनंद झाला असता.
असा माझा अण्णा आज त्याच्या आयुष्यातले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे.त्याबद्दल त्याला अनेक शुभेच्छा.......
Happy Birthday अण्णा!!!