Saturday, October 10, 2020

महानायक ७८

सरस्वतीमातेचा वरदहस्त असलेल्या एका बहुश्रुत कुटुंबातून आलेला तरुण अभिनय क्षेत्राची वेगळी वाट निवडतो.अनेकदा पडतो.पण चालत राहतो कधी त्याच्या उंचीवरून कधी त्याचा सामान्य चेहरा पाहून त्याला अनेकांकडून अवहेलना सहन करायला लागते.निराशा होते, एकांतात रडणे होते.ही वाट सोडून द्यावी असे ही वाटते.पण त्याचे कलासक्त माता पिता त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहतात.एक छोटीशी भूमिका मिळते.सुनिल दत्तच्या मुक्या भावाची. चित्रपट "रेश्मा और शेरा".वाटचाल सुरु होते. "सात हिन्दूस्थानी" मधला सैनिक सगळ्याना भावतो.हा लंबी रेस का घोडा आहे हे जाणवते पण हा सगळ्या समकालीन पुरुष नटांची छुट्टी करून टाकणार आहे हे कोणाला जाणवत नाही;कारण याचे समकालीन नट एक से बढकर एक होते.देखणा विनोद खन्ना,जंपींग जैक जितेंद्र,सुपरस्टार राजेश खन्ना,राजस शशी कपूर,अभिनय सम्राट संजीव कुमार,ही मैन धर्मेंद्र यांच्या खिजगणतीत ही हा नव्हता.तो काही विनोद खन्ना किंवा राजेश खन्ना सारखा देखणा नव्हता,शशी कपूर सारखा राजबिंडा नव्हता.धर्मेन्द्रसारखा रांगडा नव्हता की जितेन्द्र सारखा नृत्य निपुण नव्हता.सुरुवातीच्या काही चित्रपटांत तर अभिनय ही ठिक ठाक होता.पण असे काय होते याच्याकडे ते की त्याच्या जोरावर तो या सर्व त्याच्या समकालीनांना मात देऊन त्यांच्या दशांगुळे वर राहिला.तो होता प्रचंड आत्मविश्वास अन् सतत आपल्या चुकांतून शिकण्याची वृत्ती.याच जोरावर तो आज वयाची सत्यात्तरी उलटली तरी या अभिनयाच्या क्षेत्रात टिकून आहे नव्हे त्याच्यावर राज्य करतोय.ज्याला त्याच्या एका चित्रपटात मुक्याची भुमिका करावी लागली होती.आज त्याचा आवाज ही त्याची USP आहे.त्याच्यासारखा आवाज काढून आज कितितरी नकलाकार आपले पोट भरतायत.सुरुवातीला ठिक ठाक असलेले अभिनयाचे नाणे त्याने प्रचंड मेहनतीने आणि नेहमी सतत शिकत रहाण्याच्या वृत्तीच्या अर्काने घासून लखलखते ठेवलय.म्हणून तर ते अजून खणखणीत वाजतेय.किती वेगवगळ्या भुमिका निभावल्यात चटकन आठवायला गेले तर "चुपके चुपके"मधला सरळ साधा प्रोफेसर सुकुमार सिन्हा,"अभिमान" मधला गायक सुबीर कुमार अश्या अनेक....हे झाले सहज सुंदर अभिनयाबाबत पण हाणामारीच्या चित्रपटांत ही कमालीची मास्टरी.काय होते हयाच्याकडे..ना धर्मेंद्र सारखे कमावलले शरीर होते ना विनोद खन्ना सारखा रांगडेपणा. साधी किडकिडित शरीरयष्टी.पण जे आपल्याकडे नाही ते आपल्याकडे जे आहे त्यांचा वापर करून सादर करणे म्हणजे अभिनय हे त्याने जाणले आणि नसलेल्या गोष्टींची सर त्याने त्याच्याकडे असलेल्या गोष्टींनी भरून काढली ती म्हणजे उत्तम अभिनय,भारदस्त आवाज आणि भेदक डोळे.याच जोरावर तो चित्रपटसृष्टीतला अभिनयाचा शेहेनशाह बनला.मला तर त्याच्या अभिनयातल्या अनेक लखलखीत तुकड्यांमधले काही तुकडे आठवतात."दिवार" मधला तो हॉटेल मधला प्रसंग!! परवीन बाबी त्याची कंपनी मिळावी म्हणून त्याच्याशी लगट करते.तेंव्हा "किसको मरना है!! जो आज मेरे साथ होगा!!" हे तो ज्या पद्धतीने म्हणतो. एका क्षणात एका आपल्या मस्तीत जगणारया,मरणाचीपण परवा नसलेल्या माणसाची व्यक्तिरेखा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते.त्यानंतर हॉटेल मधून त्याच्या गाडीपर्यंत त्याचा walk.....या त्याच्या नुसत्या रुबाबदार,बेफिकीर चालीसाठी मी दीवार कितितरी वेळा बघितलाय.अग्नीपथ चित्रपटातील त्याच्या बहिणीच्या अपहरणाचा प्रसंग...गुंडांच्या अड्ड्यावर तो बहिणीला वाचवायला शिरतो. चिखलात माखलेल्या,अंगावरची वस्त्रे काही ठिकाणी फाटलेल्या,असहाय बहिणीला पाहून डोळ्यांत अंगार फुललेला पण त्याचवेळी ज्याने त्याच्या बहिणीचे अपहरण केले त्याच्याकडे पाहून रागमिश्रित तुच्छतापूर्वक हास्य त्याच्या चेहर्यावर उमटते.माझ्या अंगावर काटा उभा राहिला त्याचा अविर्भाव बघून.उगीच नाही या भूमिकेसाठी सर्वोत्तम अभिनयाचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले.तो खरोखरच त्यासाठी पात्र होता.आतापर्यंत 4 वेळा अभिनयासाठी राष्ट्रीय पारितोषिक मिळालेय.त्यातली 3 तर वयाची साठी ओलांडल्यानंतर.आज ही वयाच्या 8व्या दशकाची झुळुक लागलीय तरी तोच उत्साह आहे.आज ही दिवसांतले पंधरा पंधरा तास काम चालू आहे.त्याचे सर्व समकालीन आता मोडीत निघाले पण तो आज ही आपला आब राखून आहे.आयुष्यात अनेक लढाया जिंकून,हरून झाल्यात.मग त्या राजकिय कारकीर्दीबाबतीत असो वा वैयक्तीक आयुष्याबाबतीत असो वा तब्येतीच्या बाबतीत असो.नुकतीच करोनाविरुद्धची लढाई जिंकून झालीय.आज ही कामाच्या प्रति तीच निष्ठा आहे.प्रसिद्ध मराठी अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी "खाकी" चित्रपटाच्या वेळची नमूद केलेली आठवण खूप बोलकी आहे.एखादा सीन त्याला दिला की हा माणूस एखाद्या नवशिक्याप्रमाणे तो सीन समजून घ्यायचा आणि हा आपल्या आयुष्यातला पहिलाच सिन आहे असं समजून त्या तडफ़ेने तो सिन करायचा. ह्याला म्हणतात कामावर असलेली निष्ठा.वेळेच्या बाबतीत खूपच काटेकोर आहे.मला एक प्रसंग आठवतो.अंधेरीत एका कार्यक्रमाची वेळ होती सकाळी 9 ची. तो येणार होता.पण एव्ह्ढा मोठा माणूस तो कशाला वेळेत येयील असे समजून संयोजक मंडळी गफिल होती.तो बरोबर 9 च्या ठोक्याला हजर झाला.संयोजक मंडळी चाट.रात्रभर एका चित्रपटाचे चित्रीकरण आटपून तो आला होता. पण चेहर्यावर थकावटीचा लवलेश नव्हता.गोंधळलेल्या संयोजक मंडळींवर अजिबात न चिडता थांबला. नियोजित कार्यक्रम आटपून स्वारी रवाना झाली.त्याच्या आगमनानंतर ते आतापर्यंत चित्रपट सृष्टी खूप बदलली फोफावली,वाढली.तंत्र बदलले. नव्या विचाराचे, ताज्या दमाचे लोक आले.तो पण या सर्वात अत्यंत सहजपणे सामावून गेला. याचा कारण त्याने काळानुरूप स्वतःला बदललं .म्हणूनच तर आजही नव्या दिग्दर्शकांबरोबर काम करायला तो उत्सुक असतो आणि नवे दिग्दर्शकही त्याच्याबरोबर काम करणं हा एक सन्मान समजतात. नुकताच त्याचा "गुलाबो सीताबो" हा सुजीत सरकार या ताज्या दमाच्या दिग्दर्शकाबरोबरचा चित्रपट पाहिला. एका 90 वर्षाच्या कवडीचुंबक म्हाताऱ्याची व्यक्तिरेखा एवढं अप्रतिम वठवलीय की त्याला तोड नाही. त्या 90 वर्षाच्या म्हातारयाचे पोक काढून चालणे, त्याच्या आवाजात वयपरत्वे आलेला कंप, त्याचा कवडीचुंबकपणा हे सगळे एवढे अप्रतिम ह्या माणसाने दाखवलं की खरंच आपल्याला अभिमान वाटतो की आपल्या देशात "अमिताभ बच्चन" नावाचा महानायक जन्माला आला आहे. आपण खूपदा हॉलीवुडमधल्या कलाकारांचे गोडवे गातो उदाहरणार्थ जॅक नीकोलसन, रॉबर्ट डी निरो,अल पचिनो वैगेरे. मलाही हे कलाकार आवडतात.रॉबर्ट डी निरो तर माझा खूप आवडता अभिनेता आहे.पण मला अमिताभ या कलाकारांपेक्षा कुठेही कमी नाही उलट काकणभर सरसच वाटतो.अशा या महानायकाचा आज वाढदिवस.

बच्चन साहेबाना उदंड आयुष्य लाभो हीच याप्रसंगी एक त्यांचा चाहता म्हणून प्रार्थना.

No comments:

Post a Comment