Friday, February 12, 2021

वात्सल्यमूर्ती कल्पवृक्ष

आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कल्पवृक्ष म्हणून एक काल्पनिक संकल्पना आहे हा कल्पवृक्ष म्हणजे असा एक वृक्ष असतो की त्याच्या पुढे उभे राहून कोणी काही मागितले तर त्याच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात आणि हा कल्पवृक्ष नेहमी आपल्या प्रेमाची, वात्सल्याची सावली आपल्या आश्रयास आलेल्या लोकांवर धरत असतो. गावडे घराण्याचा असाच एक वात्सल्यमूर्ती कल्पवृक्ष आज कायमचा कोमेजला!!!
गावडे घराणातल्या वरिष्ठ फळीमधली आम्हा सर्वांची लाडकी जयश्री आजी ,आमच्या विजय मामाची आई, सर्वाची लाडकी काकीचे आज निधन झाले.वात्सल्याचे कुठलं रूप असे जर आपण मनामध्ये त्याचं चित्र काढलं तर ते बहुतेक आमच्या आजीच्या रूपातच असावं.आपल्या वात्सल्यपूर्ण  प्रेमाची छाया तिने संपूर्ण कुटुंबावर गेली साठ वर्षे धरली होती. एक आदर्श गृहिणी तर होतीच पण त्याबरोबर ती एक आदर्श शिक्षिका ही होती. आदर्श शिक्षिका आणि नंतर मुख्याध्यापिका म्हणून एका प्रतिष्ठित शाळेतून निवृत्त झाल्यानंतर वानप्रस्थाश्रमही तिने खूप चांगल्या प्रकारे जगला असंच म्हणावे लागेल.सुगरण तर इतक्या वरच्या दर्जाची होती की तिने जेवताना वाढलेले पाणी ही चविष्ट लागायचे. तिच्या घरी गेल्यावर जेवणाचा आग्रह तो नेहमीचाच. तिच्या हातच्या जेवणाने पोट भरून जायचे पण मन भरायचे नाही. हस्ताक्षर तर एखाद्या छापील अक्षरापेक्षा सुंदर आणि रेखीव होते( तिच्या लाडक्या नातवामध्ये म्हणजेच देवाशिष मध्ये हा गुण अगदी अचूक उतरला आहे).
गावडे कुटुंबाच्या सुखात आणि दुःखात या कल्पवृक्षाची वात्सल्यपूर्ण सावली नेहमीच असायची. कुटुंबाच्या प्रत्येक समारंभात तर तिची हजेरी हे विशेष आकर्षण असायचे.अतिशय साधी पण आकर्षक वेशभूषा करून एखाद्या गर्भश्रीमंत संस्थानच्या महाराणीसारखी दिसणारी; पहिल्या रांगेत बसून शांतपणे सगळ्या कार्यक्रमाचा आनंद घेत बसलेली काकी आजी यापुढे दिसणार नाही याची चुटपुट यापुढे कायमची सगळ्यांना लागेल. अगदी आताआतापर्यंत तिला एवढा मोठे आजारपण आले असतानादेखील आपल्या नातवाच्या म्हणजे माझा चुलत मामेभाऊ विनितच्या लग्नात तिची हजेरी होती. या वात्सल्यमूर्तीने किती जणांना सांभाळले, त्यांना त्यांच्या पायावर उभे केले त्याची गणतीच नाही. त्यात सख्खे रक्ताचे तर होतेच पण सख्खे नसलेले जास्त होते. आजीने सर्वांना प्रेम, आपुलकी दिली. कधी कोणाकडून कसलीही अपेक्षा ठेवली नाही. त्यामुळेच तिचा प्रेमाचा गोतावळा एव्हढा मोठा आहे जो तिला या आयुष्यात तरी कधी विसरू शकत नाही. या दुष्ट आजारामुळे तीचे शेवटचे काही दिवस खूप कठीण गेले होते. गेले दोन दिवस तर ती अतिशय शांत झाली होती. समाधानी होती. कारण तिला कळलं होतं.असं कळणं आणि वास्तव स्वीकारणे फारच कमी लोकांना जमतं.जगाचा निरोपही तिने त्याच शांतपणे झोपेतच घेतला. कोणालाही त्रास न होऊ देता!!! आजी आज जरी तु आमच्यात नसलीस तरी तुझ्या आठवणींच्या रूपाने तू सदैव आमच्या मध्येच आहेस.....

Saturday, October 31, 2020

"अलविदा सर शाॅन"

बॉंडपटाच्या इतिहासातला सर्वप्रथम बॉण्ड आज काळाच्या पडद्याआड गेला....
"सर शॉन कॉनरी" या स्कॉटीश अभिनेत्याचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी निधन झालं. "ईयान फ्लेमींग" या ब्रिटिश लेखकाने "MI6" या खर्‍याखुर्‍या ब्रिटिश गुप्तहेर संघटनेतील हे "जेम्स बॉण्ड 007" नावाचे काल्पनिक पात्र निर्मिले.हा नायक रांगडा होता, तितकाच तो रोमँटिक होता,दिसायला देखणा, उंचापुरा, बोलायला चतुर आणि पिस्तूल चालवण्यात वाकबगार असा होता.शॉन कॉनरीच्या व्यक्तिमत्त्वात हे सारे गुण बॉंडपटाच्या निर्मात्यांना ठळकपणे दिसून आले आणि तो अजरामर व्यक्तिरेखेचा पहिला मानकरी बनला. त्याने एकूण सात चित्रपटात बॉंड साकारला.एवढी अमीट छाप त्या भूमिकेवर सोडणे त्याच्यानंतर ही भुमिका साकारणारया  दुसर्या  कुठल्याही अभिनेत्याला जमले नाही.पण म्हणून बॉण्ड साकारणारा अभिनेता या चाकोरीत अडकवणे हे शॉन कॉनरीचा अपमान ठरेल. "हंट फोर रेड ऑक्टोबर" यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने आपले अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवले.अत्यंत गाजलेल्या "अनटचेबल्स" या ब्रायन डी पाल्मा दिग्दर्शित  माफियापटात त्याने साकारलेला पोलीस ऑफीसर जिमी मलोन कमालीचा प्रभावी होता.अभिनेत्यांचा अभिनेता असे ज्याचे वर्णन केले जाते असा "रॉबर्ट डी निरो",तत्कालीन हॉलीवूड सुपरस्टार "केविन कॉस्टनर",आपल्या सहज अभिनयासाठी  प्रसिध्द असलेला "अँडी गर्सिया" अश्या तगड्या अभिनेत्यांची फौज या चित्रपटात असून देखील कॉनरीने आपल्या भूमिकेसाठी त्या वर्षीचे सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्याचे ऑस्कर पटकावले हा एव्हढा पुरावा तो किती चांगला अभिनेता होता हे सांगायला पुरेसा ठरतो.ऑस्कर मिळवणारा तो पहिला(आणि एकमेव) "बॉण्ड" ठरला आणि त्याचा हा विक्रम अद्याप अबाधित आहे." इंडियना जोन्स अँड द लास्ट कृसेड"  चित्रपटातली नायकाच्या पित्याची भूमिकाही विशेष गाजली. "फाईंडिंग फोरेस्टर" या गस वॅन सांट दिग्दर्शित चित्रपटातील त्याची "विल्यम फॉरेस्टर" या विस्मृतीत गेलेल्या साहित्यिकाची भूमिकाही मला फार आवडली होती.2000 साली त्याला "सर" या पदवीने सन्मानित करण्यात आले.आपण स्कॉटीश असण्याचा कमालीचा अभिमान त्याला होता.आणि "बॉंड" च्या व्यक्तिरेखेला कोणी न्याय देऊ शकेल तर तो केवळ एखादा स्कॉटीश ,आयरिश अथवा ब्रिटिश अभिनेताच देऊ शकेल;अमेरीकन किंवा अन्य कोणी त्याला न्याय देऊ शकणार नाही असे तो जाहीरपणे सांगायचा.त्याची ही भविष्यवाणी खरी ठरली कारण त्याच्यानंतर बॉंड साकारणारे "रॉजर मूर","तिमोथी दाल्तन", "डैनिएल क्रेग" हे ब्रिटिश अभिनेते तर "पियर्स ब्रॉस्सनान" हा आयरिश अभिनेता कमालीचे लोकप्रिय ठरले तर "जॉर्ज लेसेंबी" या ऑस्ट्रेलियन अभिनेत्याला प्रेक्षकानी नाकारले ही वस्तुस्थिती आहे. अशा या हरहुन्नरी आणि "जेम्स बॉण्ड" या सर्वमान्य लोकप्रिय अशा गुप्तहेराच्या व्यक्तिमत्वाला पुरेपूर न्याय देणाऱ्या या नटश्रेष्ठाला भावपूर्ण श्रद्धांजली.

Saturday, October 10, 2020

महानायक ७८

सरस्वतीमातेचा वरदहस्त असलेल्या एका बहुश्रुत कुटुंबातून आलेला तरुण अभिनय क्षेत्राची वेगळी वाट निवडतो.अनेकदा पडतो.पण चालत राहतो कधी त्याच्या उंचीवरून कधी त्याचा सामान्य चेहरा पाहून त्याला अनेकांकडून अवहेलना सहन करायला लागते.निराशा होते, एकांतात रडणे होते.ही वाट सोडून द्यावी असे ही वाटते.पण त्याचे कलासक्त माता पिता त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहतात.एक छोटीशी भूमिका मिळते.सुनिल दत्तच्या मुक्या भावाची. चित्रपट "रेश्मा और शेरा".वाटचाल सुरु होते. "सात हिन्दूस्थानी" मधला सैनिक सगळ्याना भावतो.हा लंबी रेस का घोडा आहे हे जाणवते पण हा सगळ्या समकालीन पुरुष नटांची छुट्टी करून टाकणार आहे हे कोणाला जाणवत नाही;कारण याचे समकालीन नट एक से बढकर एक होते.देखणा विनोद खन्ना,जंपींग जैक जितेंद्र,सुपरस्टार राजेश खन्ना,राजस शशी कपूर,अभिनय सम्राट संजीव कुमार,ही मैन धर्मेंद्र यांच्या खिजगणतीत ही हा नव्हता.तो काही विनोद खन्ना किंवा राजेश खन्ना सारखा देखणा नव्हता,शशी कपूर सारखा राजबिंडा नव्हता.धर्मेन्द्रसारखा रांगडा नव्हता की जितेन्द्र सारखा नृत्य निपुण नव्हता.सुरुवातीच्या काही चित्रपटांत तर अभिनय ही ठिक ठाक होता.पण असे काय होते याच्याकडे ते की त्याच्या जोरावर तो या सर्व त्याच्या समकालीनांना मात देऊन त्यांच्या दशांगुळे वर राहिला.तो होता प्रचंड आत्मविश्वास अन् सतत आपल्या चुकांतून शिकण्याची वृत्ती.याच जोरावर तो आज वयाची सत्यात्तरी उलटली तरी या अभिनयाच्या क्षेत्रात टिकून आहे नव्हे त्याच्यावर राज्य करतोय.ज्याला त्याच्या एका चित्रपटात मुक्याची भुमिका करावी लागली होती.आज त्याचा आवाज ही त्याची USP आहे.त्याच्यासारखा आवाज काढून आज कितितरी नकलाकार आपले पोट भरतायत.सुरुवातीला ठिक ठाक असलेले अभिनयाचे नाणे त्याने प्रचंड मेहनतीने आणि नेहमी सतत शिकत रहाण्याच्या वृत्तीच्या अर्काने घासून लखलखते ठेवलय.म्हणून तर ते अजून खणखणीत वाजतेय.किती वेगवगळ्या भुमिका निभावल्यात चटकन आठवायला गेले तर "चुपके चुपके"मधला सरळ साधा प्रोफेसर सुकुमार सिन्हा,"अभिमान" मधला गायक सुबीर कुमार अश्या अनेक....हे झाले सहज सुंदर अभिनयाबाबत पण हाणामारीच्या चित्रपटांत ही कमालीची मास्टरी.काय होते हयाच्याकडे..ना धर्मेंद्र सारखे कमावलले शरीर होते ना विनोद खन्ना सारखा रांगडेपणा. साधी किडकिडित शरीरयष्टी.पण जे आपल्याकडे नाही ते आपल्याकडे जे आहे त्यांचा वापर करून सादर करणे म्हणजे अभिनय हे त्याने जाणले आणि नसलेल्या गोष्टींची सर त्याने त्याच्याकडे असलेल्या गोष्टींनी भरून काढली ती म्हणजे उत्तम अभिनय,भारदस्त आवाज आणि भेदक डोळे.याच जोरावर तो चित्रपटसृष्टीतला अभिनयाचा शेहेनशाह बनला.मला तर त्याच्या अभिनयातल्या अनेक लखलखीत तुकड्यांमधले काही तुकडे आठवतात."दिवार" मधला तो हॉटेल मधला प्रसंग!! परवीन बाबी त्याची कंपनी मिळावी म्हणून त्याच्याशी लगट करते.तेंव्हा "किसको मरना है!! जो आज मेरे साथ होगा!!" हे तो ज्या पद्धतीने म्हणतो. एका क्षणात एका आपल्या मस्तीत जगणारया,मरणाचीपण परवा नसलेल्या माणसाची व्यक्तिरेखा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते.त्यानंतर हॉटेल मधून त्याच्या गाडीपर्यंत त्याचा walk.....या त्याच्या नुसत्या रुबाबदार,बेफिकीर चालीसाठी मी दीवार कितितरी वेळा बघितलाय.अग्नीपथ चित्रपटातील त्याच्या बहिणीच्या अपहरणाचा प्रसंग...गुंडांच्या अड्ड्यावर तो बहिणीला वाचवायला शिरतो. चिखलात माखलेल्या,अंगावरची वस्त्रे काही ठिकाणी फाटलेल्या,असहाय बहिणीला पाहून डोळ्यांत अंगार फुललेला पण त्याचवेळी ज्याने त्याच्या बहिणीचे अपहरण केले त्याच्याकडे पाहून रागमिश्रित तुच्छतापूर्वक हास्य त्याच्या चेहर्यावर उमटते.माझ्या अंगावर काटा उभा राहिला त्याचा अविर्भाव बघून.उगीच नाही या भूमिकेसाठी सर्वोत्तम अभिनयाचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले.तो खरोखरच त्यासाठी पात्र होता.आतापर्यंत 4 वेळा अभिनयासाठी राष्ट्रीय पारितोषिक मिळालेय.त्यातली 3 तर वयाची साठी ओलांडल्यानंतर.आज ही वयाच्या 8व्या दशकाची झुळुक लागलीय तरी तोच उत्साह आहे.आज ही दिवसांतले पंधरा पंधरा तास काम चालू आहे.त्याचे सर्व समकालीन आता मोडीत निघाले पण तो आज ही आपला आब राखून आहे.आयुष्यात अनेक लढाया जिंकून,हरून झाल्यात.मग त्या राजकिय कारकीर्दीबाबतीत असो वा वैयक्तीक आयुष्याबाबतीत असो वा तब्येतीच्या बाबतीत असो.नुकतीच करोनाविरुद्धची लढाई जिंकून झालीय.आज ही कामाच्या प्रति तीच निष्ठा आहे.प्रसिद्ध मराठी अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी "खाकी" चित्रपटाच्या वेळची नमूद केलेली आठवण खूप बोलकी आहे.एखादा सीन त्याला दिला की हा माणूस एखाद्या नवशिक्याप्रमाणे तो सीन समजून घ्यायचा आणि हा आपल्या आयुष्यातला पहिलाच सिन आहे असं समजून त्या तडफ़ेने तो सिन करायचा. ह्याला म्हणतात कामावर असलेली निष्ठा.वेळेच्या बाबतीत खूपच काटेकोर आहे.मला एक प्रसंग आठवतो.अंधेरीत एका कार्यक्रमाची वेळ होती सकाळी 9 ची. तो येणार होता.पण एव्ह्ढा मोठा माणूस तो कशाला वेळेत येयील असे समजून संयोजक मंडळी गफिल होती.तो बरोबर 9 च्या ठोक्याला हजर झाला.संयोजक मंडळी चाट.रात्रभर एका चित्रपटाचे चित्रीकरण आटपून तो आला होता. पण चेहर्यावर थकावटीचा लवलेश नव्हता.गोंधळलेल्या संयोजक मंडळींवर अजिबात न चिडता थांबला. नियोजित कार्यक्रम आटपून स्वारी रवाना झाली.त्याच्या आगमनानंतर ते आतापर्यंत चित्रपट सृष्टी खूप बदलली फोफावली,वाढली.तंत्र बदलले. नव्या विचाराचे, ताज्या दमाचे लोक आले.तो पण या सर्वात अत्यंत सहजपणे सामावून गेला. याचा कारण त्याने काळानुरूप स्वतःला बदललं .म्हणूनच तर आजही नव्या दिग्दर्शकांबरोबर काम करायला तो उत्सुक असतो आणि नवे दिग्दर्शकही त्याच्याबरोबर काम करणं हा एक सन्मान समजतात. नुकताच त्याचा "गुलाबो सीताबो" हा सुजीत सरकार या ताज्या दमाच्या दिग्दर्शकाबरोबरचा चित्रपट पाहिला. एका 90 वर्षाच्या कवडीचुंबक म्हाताऱ्याची व्यक्तिरेखा एवढं अप्रतिम वठवलीय की त्याला तोड नाही. त्या 90 वर्षाच्या म्हातारयाचे पोक काढून चालणे, त्याच्या आवाजात वयपरत्वे आलेला कंप, त्याचा कवडीचुंबकपणा हे सगळे एवढे अप्रतिम ह्या माणसाने दाखवलं की खरंच आपल्याला अभिमान वाटतो की आपल्या देशात "अमिताभ बच्चन" नावाचा महानायक जन्माला आला आहे. आपण खूपदा हॉलीवुडमधल्या कलाकारांचे गोडवे गातो उदाहरणार्थ जॅक नीकोलसन, रॉबर्ट डी निरो,अल पचिनो वैगेरे. मलाही हे कलाकार आवडतात.रॉबर्ट डी निरो तर माझा खूप आवडता अभिनेता आहे.पण मला अमिताभ या कलाकारांपेक्षा कुठेही कमी नाही उलट काकणभर सरसच वाटतो.अशा या महानायकाचा आज वाढदिवस.

बच्चन साहेबाना उदंड आयुष्य लाभो हीच याप्रसंगी एक त्यांचा चाहता म्हणून प्रार्थना.

Sunday, September 27, 2020

नाळ

 मातेच्या गर्भातला जीव नवमास भरले कि या वास्तवादी जगात प्रवेश करतो तेंव्हा त्याच्या मातेच्या गर्भाशयाशी ज्या नाळेने  जोडलेला असतो ती  नाळ कापून  डॉक्टर त्या बाळाला गर्भाशयापासून विलग करतात पण त्या नाळेचा काही भाग तुकडा मात्र तसाच बाळाशी चिकटलेला असतो.जो काही दिवसानी आपोआप गाळून पडतो .पण मला असे वाटते की माता केवळ स्वत:च्या नाळेशी जोडलेल्या आपल्या बाळाला केवळ आपले गुणधर्म देते असे नाही तर आपली स्वप्ने मनातल्या ईच्छा आकांक्षा पण देत असावी.म्हणूनच जेंव्हा ती नाळ कापून बाळ वेगळे होते तेंव्हा तो तिच्या ईच्छा आकांक्षारूपी नाळेचा तुकडा बाळाला चिकटून राहतो आणि मग त्या ईच्छा आकांक्षा बाळामध्ये झिरपल्या की मग ती नाळ आपोआप गाळून पडते. आमच्या मंदाआत्येला कोकणाचे भयंकर अप्रूप होते एव्हढे की सम्पूर्ण हयात मुंबईत घालवून देखील ती नेहमी मालवणीतूनच बोलायची. गावाकडच्या आठवणीत रमायची. तिची एक ईच्छा होती की कोकणात आपले एक ऐसपैस घर असावे आणि हेच तिचे स्वप्न उदयदादामध्ये झिरपले असावे .आत्येने तिचे स्वप्न तिने उदयदादा तीच्या गर्भात असताना पेरले असावे. कारण दादाने अक्षरशः ध्यास घेतला होता की माझ्या कोकणात माझे स्वत:चे असे एक घर असायला पाहिजे कारण त्यालाही आता कुठे जाणवत होतं की आपली नाळ या कोकणाच्या मातीशी घट्ट जोडलेली आहे . मग त्याचा शोध सुरु झाला आणि मालवणातील कट्टा या गावाजवळ येऊन थांबला. दादाच्या स्वप्नातले घरकुल उभे राहिले . नावही त्याने खूप विचार करून ठेवलेय ,"अद्वैत " याचा अर्थ कोणाशीही द्वैत म्हणजे वैर नसलेला. हे घर हे नुसतं घर नाहीये त्यातून दादाचा रसिक स्वभाव ठायी ठायी जाणवेल . मला असं वाटतं ह्या घराची हीच खासियत आहे की या घरावर आणि त्यातल्या प्रत्येक गोष्टींवर उदय दादाचा ठळक ठसा जाणवतो.त्याने नव्याने उभारलेली पुष्करिणीही त्याला अपवाद नाही. एखाद्या आईने ज्या मायेने,प्रेमाने आपल्या लेकीला सजववावे तद्वत दादाने आपला हा स्वप्नमहाल सजविला आहे.दादाने त्याच्या मनात या घराबद्दल चे वाटतं ते शब्दात मांडले खरे पण ते खूपच अपूर्ण आहे असे मला वाटते कारण या घराबद्दल त्याला जे वाटते ते शब्दांत मांडणे अवघड आहे.खरं म्हणजे घराचा विषय निघाला तर तो बोलायचा थांबतच नाही इतक्या घराबद्दल त्याला प्रेम आहे आणि खरच हे घर त्याच्यासाठी स्पेशल आहे कारण उदयदादासाठी हे केवळ घर नाही तर एक स्वकष्टाने पूर्ण केलेली स्वप्नपूर्ती आहे. त्याची नाळ त्या घराशी आणि कोकणच्या मातीशी घट्ट जोडली गेली आहे. 

Tuesday, August 18, 2020

कायम कार्यालय प्रमुख

ज्यांच्या नावातच सुरुवातीला "श्री" हे परम आदरणीय संबोधन आहे त्या माननिय श्रीकृष्ण आंबेकरांचा आज वाढदिवस. पक्षात अनेक पदे भूषविलेल्या आंबेकरजींची आम्हा विले पार्ले विधानसभेतील कार्यकर्त्यांसाठी ओळख ही (आमचे परम आदरणीय गुरुदेव प्रवीर कपूर आंबेकरजींना म्हणतात त्याप्रमाणे ) "का .का .प्र " अर्थात "कायम कार्यालय प्रमुख" हीच आहे.जन्म गोकुळष्टमीचा असल्याने त्यांचे नाव श्रीकृष्ण ठेवण्यात आले पण ज्याने कोणी हे नाव त्यांना दिले त्या व्यक्तीला आंबेकरांचे पुढचे भविष्य नक्की दिसले असावे कारण श्रीकृष्ण हा एक कुशल राजकारणी होता,आपल्या लोकांवर त्याचा प्रचंड प्रभाव होता,बोलण्यात चतुर होता आणि राजकारणाशिवाय देखील अनेक विषयांत त्याला कमालीची गती होती.तो एक मुकुट नसलेला राजा होता.आंबेकरजींचे सुद्धा तसेच; राजकारणात तर ते मुरलेले आहेतच,आपल्या प्रभागात (प्रभाग क्र . ८४) मध्ये त्यांचा प्रचंड आदरयुक्त प्रभाव आहे. मराठी टायपिंग ,इंटरनेट,शेअर मार्केट,Desktop publishing (abbreviated DTP),online shopping अश्या अनेक विषयांत आंबेकरजीना कमालीची गती आहे . विले पार्ले (पू) चे GADGET GURU म्हणून आंबेकरजींचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.फावल्या वेळेत इंटरनेट वर विविध माहिती घेणे हा त्यांचा आवडीचा विरंगुळा आहे . त्यामुळेच तर दहा हजाराचा स्पीकर केवळ दोन हजारात खरेदी करायची किमया आंबेकरजीच करू जाणोत.त्यांच्या collection मध्ये महागड्या घड्याळांपासून,drone device पर्यंत सगळे मिळेल तुम्हाला. त्यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या आयुष्यात केलेले विविध व्यवसाय हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. अत्यंत मितभाषी आणि विविध विषयांमध्ये कमालीचे पारंगत असलेले व्यक्तिमत्व. राजकारणाच्या,समाजकारणाच्या कामातून अनुभवलेले अनेक किस्से आंबेकरजींकडे आहेत आणि ते किस्से रंगवून सांगण्याची त्यांची हातोटी जबरदस्त आहे. मी परागजींबरोबर काम करत असताना मला अनेक चांगल्या लोकांचा सहवास लाभला. त्यातही आंबेकरजींचा सहवास जरा जास्त लाभला; तेंव्हा आंबेकरजींकडून असे अनेक किस्से आम्ही ऐकलेत ते सांगताना एरवी अत्यंत कमी बोलणारे आंबेकरजी किती खुलून यायचे,वेगळेच दिसायचे. मला वाटायचे तेच खरे आंबेकरजी. आपल्या सुहृदांमध्ये रमणारे . आपल्या मर्जीप्रमाणे आयुष्य जगलेल्या आंबेकरजींनी कोणाच्या मुर्वतीखातर आपल्या आवड निवडीला मुरड घातली नाही. स्वतः वर कसलीही बंधने लादून घेतली नाहीत अगदी वैवाहिक बंधन देखील.माझे मत विचाराल तर त्यांच्यासारख्या मोकळेढाकळे आयुष्य जगलेल्या माणसाला असे कोणतेही बंधन मानवले नसते (हे माझे वैयक्तिक मत आहे . कृपया गैरसमज नको ). मी परागजींच्या कार्यालयात असताना अनेकदा आंबेकरजींबरोबर पंक्तीला बसायचा योग आला,कित्येकदा ICE CREAM चे फड रंगले या बाबतीही आंबेकरजींच्या दिलदार आणि चोखंदळ स्वभाव आम्हाला दिसायचा .जे जे चांगले ते आपले हा त्यांचा स्थायी भाव; मग ते खाणे पिणे असो वा इतर काही. कल्याणजवळच्या मुरबाड गावाला आंबेकरजींनी विले पार्ल्याच्या नकाशात पोचवले.आंबेकरजी आता मुरबाडचे पार्ल्यातले brand ambassador बनले आहेत. काही वर्षांपूर्वी पक्षाच्या कार्यालयात आलेल्या आंबेकरजींना स्वप्नातही वाटले नसेल की त्या पक्षात आपल्याला एव्हढा मान मिळेल पण हा मान आंबेकरजींना सहज मिळालेला नाही त्यासाठी खूप कष्ट,त्याग त्यांना करावा लागला. पक्षाबद्दल ,आपल्या विधानसभेबद्दल आणि आपल्या नेत्याबद्दल त्यांची निष्ठा भक्तिभावाच्यापातळीवर जाणारी आहे .परागजींच्या अत्यंत जवळच्या वर्तुळातले एक म्हणून आंबेकरजी ओळखले जातात ते उगीच नाही . मी वरती म्हटल्याप्रमाणे आंबेकरजी हे कायम कार्यालय प्रमुख आहेत कारण कार्यालयात त्यांची करडी नजर असते . वेळप्रसंगी एखाद्याचे कडक शब्दात कान उपटायला ते मागेपुढे पाहात नाहीत मग तो कोणी असो. कार्यालयात असलेल्या शिस्तीचे श्रेय आंबेकरजी आणि आता विवेक ताम्हणकर यांना जाते. (योगायोग बघा या दोन कडक शिस्तीच्या मास्तरांचा वाढदिवस एका मागोमाग एक आहे उद्या दि.२० ऑगस्ट हा विवेकजींचा वाढदिवस ). तर असे हे आमचे आंबेकरजी . माझे पूर्वीसारखे वरचेवर कार्यालयात जाणे होत नसल्याने सध्या आमची बरेच दिवस भेट नाही. पण जेंव्हा केंव्हा आमची भेट होईल तेंव्हा आंबेकरजी आपल्या ठेवणीतल्या हास्याने माझे स्वागत करतील हे नक्की.आणि मग ICE CREAM पक्का . बघू कधी योग येतोय तो....... खरे तर काही वर्षांपूर्वी आपल्या वयाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आंबेकरजींनी साजरे केले तेंव्हा हे चार शब्द मला सुचले असते तर मला जास्त आनंद झाला असता पण IT'S BETTER LATE THAN NEVER HAPPY BIRTH DAY AMBEKARJI

Monday, August 10, 2020

Happy Birth Day Milind Ji

विलेपार्ल्याचे विधानसभा अध्यक्ष श्री.मिलिंद शिंदे यांचा आज वाढदिवस.विले पार्ल्यातील भाजप कार्यकर्त्यांमधील जे काही पहिल्या फळीतले असे कार्यकर्ते ज्यांच्याबद्दल सर्वात जास्त चर्चा विशेषत: भाजप कार्यकर्त्यांमध्येआपापसात जास्त होते त्यात मिलिंदजींचा नंबर सर्वात वरती असावा.कारण विले पार्ल्यात जेव्हढे प्रभाग आहेत त्या सर्व प्रभागांमध्ये त्यांचा सतत संचार असतो त्यामुळे सर्वात दांडगे संपर्क वर्तूळ आहे त्यांचे.शिवाय परागजींच्या आमदारफंडाची ज्योतिवहिनींच्या नगरसेविका फंडातील सर्व कामे मिलिंदजीच करतात.शिवाय ते सतत सावलीसारखे परागजीं बरोबर असतात;अश्या व्यक्तींबद्दल इतरांच्या मनात एक धारणा बनून जाते मग आपसुकच अश्या व्यक्तीच्या हीतचिंतकाची(ज्यांना ह्यांचे हित झाले की चिंता वाटते अशांची) संख्या जास्त असते.अर्थात
मिलिंदजींना याची कल्पना नाही असे अजिबात नाही पण कबड्डीचा खेळ रक्तात मुरलेल्या या माणसाला हे ही पक्के ठावूक आहे की एखादी आक्रमक चढाई (raid) जशी सुकी सोडून द्यावी लागते तसेच या हीतचिंतकांकडे दुर्लक्ष केलेले बरे.याचा अर्थ ते शांत असतात असे नाही गरज पडली तर मिलिंदजी किती आक्रमकपणा करू शकतात हे आमच्यातल्या बर्याचजणानी पार्ले महोत्सवाच्या कबड्डी स्पर्धेत बघितले आहे. या स्पर्धेत टगेगिरी करणार्यांना त्यांच्यावर भारी पडेल अशी टगेगीरी मिलिंदजींकडून पहायला मिळते.ह्या खेळाचा मिलिंदजींच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर कमालीचा प्रभाव दिसून येतो.या खेळातला रांगडेपणा हा मिलिंदजींच्या वागण्या बोलण्यात कमालीचा उतरलाय.बोलताना शिव्यांचे लडिवाळ फिक्रे असतात.बोलणेही तसे थोडे मोठ्या आवाजातच.कदाचित त्यामुळेच अनेकांना ते उद्धट वाटतात.आपल्या जिवलग मित्रांचे मिलिंदजींच्या आयुष्यात मोठे स्थान आहे. त्यात विनित गोरे हे विशेष जवळचे.आमच्या भाजप(जिल्हा) का.का.प्र.( कायम कार्यालय प्रमुखां)चा कार्यालयात जबरदस्त वचक आणि दरारा आहे.मिलींदजी त्याला अपवाद.खरे तर दोघे ही खूप चांगले मित्र पण "का.का.प्र."ना उगीचच छेडायला मिलिंदजींना भारी आवडते.आपल्या गावावर मिलिंदजींचे प्रचंड प्रेम.महिन्यातून तीन चार फेर्या असतातच.ते स्वत:च्याही फार प्रेमात आहेत.म्हणूनच तर "FACEBOOK"वर सर्वात जास्त selfies आणि स्वत:चे विविध angle चे फोटो टाकण्याची भारी हौस आहे त्यांना.इंग्रजीत एक वाक्य आहे."you can hate me you can love me but you can't forget me".हेच मिलींदजींच्या व्यक्तिमत्वाचे एका वाक्यात वर्णन आहे.त्यांना कोणी निंदो वा कोणिही वंदो मिलींदजी सर्वाना हवेहवेसेच वाटतात.
"Haapy BirthDay" मिलिंदजी....

Sunday, July 26, 2020

सखी सहचारिणी

 
प्रिय.... 
आज आपल्या लग्नाला सात वर्षे पूर्ण झाली. सात या आकड्याला तसे पाहता खूप महत्व.संगीतातल्या सरगमचे सूर सात,पावसाळ्यात दिसणारे मनमोहक इंद्रधनूचे रंग ही सात.आपल्या कुंडलीत जर सातव्या स्थानात जर शुभ ग्रह असेल तर ते अत्यंत भाग्याचे लक्षण मानले जाते. वटपौर्णिमेला सात जन्म हाच पती मिळावा असे म्हणत सुवासिनी वडाची पूजा करतात. लग्नामध्ये पण सप्तपदी असतेच.अशीच सप्तपदी पूर्ण करून तू माझ्या आयुष्यात आलीस. खरं सांगायचं तर ती वचने माझ्यापेक्षा तूच जास्त चांगली निभावली आहेस नव्हे निभावत आहेस.
काही वर्षांपूर्वी सावित्री बनून तुझ्या सत्यवानाला यमाच्या दारातून परत घेऊन आलीस.त्या आघातातून तन सावरले पण मन अजून सावरते आहे.याची जाण तुलाही आहे म्हणून तू केवळ माझी पत्नी म्हणून न राहता माझी आई पण झालीस.तळ हाताच्या फोडाप्रमाणे मला जपलेस आणि अजूनही जपतेस.माझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी झटतेस. माझ्या आवडी निवडी जपतेस .माझे राग लोभ सांभाळतेस.... कोणताही आव न आणता!! नाहीतर असे आपल्या माणसांसाठी झटणाऱ्या लोकांमध्ये "मी"पणा येऊ लागण्याची शक्यता असते,"मी नसतो किंवा नसते तर तुमचे काय झाले असते" हे आणि अशाच प्रकारची वाक्ये सारखी ऐकू येतात,अशी माणसे मग मोकळेपणाने हसत बोलत नाहीत,सतत कसल्यातरी ओझ्याखाली दबलेली वाटतात,सुदैवाने असे कोणतेही लक्षण तुझ्यात नाही.अगदी मोकळेपणाने तू माझ्याशी बोलतेस,भांडतेस,रुसतेस.तुझे धबधब्यासारखे मनमोकळे हास्य तुझे स्वभाववैशिष्ठ्य अधोरेखित करून जाते .जितका टोकाचा तुझा राग आहे, तितकेच उत्कट प्रेम तुझे माझ्यावर आहे.आपल्या सासूशी शिळोप्याच्या गप्पा मारणे हा तर आवडता छंद.आपल्या माणसांना घट्ट धरून आहेस तू.
आतापर्यंतच्या संसारीक वाटचालीत तुझी खंबीर साथ मला जगण्याचे,संकटांशी लढण्याचे बळ देत आलीय.
अशा या माझ्या सखी सहचारणीसह लग्नाचा ७वा वाढदिवस आज मी साजरा करत आहे.आम्हा दोघांच्या परिवारातल्या ज्येष्ठांचे आशीर्वाद,मित्रपरिवाराच्या शुभेच्छा आणि आम्हा दोघांपेक्षा (वयाने) लहान असलेल्या मंडळींचे प्रेम आम्हाला लाभो हीच याप्रसंगी स्वामीचरणी प्रार्थना..