Sunday, July 5, 2026

'स्पिरिट ऑफ मुंबई': एका अगतिक पिंजऱ्याचा आणि 'मजबुरी'चा इतिहास

'स्पिरिट ऑफ मुंबई': एका अगतिक पिंजऱ्याचा आणि 'मजबुरी'चा इतिहास

'स्पिरिट ऑफ मुंबई' या दोन शब्दांच्या झगमगत्या पडद्याआड मुंबईकरांच्या रक्तरंजित जखमा, वेदना आणि एका वर्गाची असह्य मजबुरी लपलेली आहे. समाजमाध्यमांवर या शब्दाचे उदात्तीकरण करणे सोपे आहे, पण मुंबईचा खरा इतिहास आणि वर्तमान पाहिले, तर हे 'स्पिरिट' नसून रोजच्या मृत्यूशी आणि भीतीशी केलेला एक अमानुष करार आहे.
मुंबईने एकामागून एक अनेक मोठे आघात झेलले आहेत.
लोकल मधील बॉम्बस्फोट (१९९३ आणि २००६) शेकडो निष्पाप जीव गेले.२६/११ चा दहशतवादी हल्ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSM) सारख्या गजबजलेल्या स्थानकावर रक्ताचे सडे पडले.नालासोपारा किंवा तत्सम हत्याकांडं आणि गुन्हेगारी ज्याने उपनगरातील सामान्य माणसाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला.
या सर्व भयानक घटना घडल्यानंतरही, दुसऱ्या दिवशी मुंबईकर पुन्हा त्याच ट्रेनमध्ये, त्याच जागेवर उभा राहून प्रवास करत होता. हे त्याचे शौर्य नव्हते, तर ती त्याची 'मध्यमवर्गीय मानसिकता' होती. "माझ्या कुटुंबाचे काय होईल?" या एकाच विचाराने, मनात प्रचंड संताप असूनही, व्यवस्थेला प्रश्न विचारण्याऐवजी त्याने स्वतःच्या भावना दाबून टाकल्या आणि तो वेळेत ऑफिस गाठण्याच्या विवंचनेत मग्न झाला.
मुंबईच्या रुळांवर रोज सरासरी ७ ते ८ लोक अपघातात जीव गमावतात किंवा अपंग होतात. गर्दीमुळे ट्रेनमधून पडणे, खांबाला आपटणे किंवा रूळ ओलांडताना होणारे हे अपघात कुणा हौसेपोटी होत नाहीत, तर ते 'फक्त आणि फक्त पोटासाठी' होतात.जर आज नऊची लोकल चुकली, तर पंचिंग उशिरा होईल, बॉस ओरडेल, पगार कापला जाईल—या भीतीपोटी माणूस स्वतःच्या जीवाचा जुगार खेळतो. हे 'स्पंदन' नाही, हा रोज सकाळी घरातून निघताना मृत्यूशी खेळला जाणारा जुगार आहे.आजचा मुंबईकर विकेंडला हॉटेलमध्ये जातो, मॉलमध्ये फिरतो, 'लाइफ एन्जॉय' करतो. पण या आनंदाच्या मागे एक अनामिक, सुप्त भीती सतत डोकं वर काढत असते
"आज मी एन्जॉय करतोय, पण उद्या सोमवारी जेव्हा मी लोकलच्या गर्दीत असेन, तेव्हा मागच्या आठवड्यात ज्या माणसाचा अपघात झाला, तसा माझा तर होणार नाही ना? मी सुरक्षित घरी परत येईन ना?"
हा प्रश्न त्याला रोज पडतो. पण या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची ताकद किंवा पर्याय त्याच्याकडे नाही. हळूहळू या कुचंबणेची, या घुसमटीची त्याला सवय होते. तो या मानसिकतेलाच आपले नशीब मानून जगत राहतो.
मुंबईकराने स्वतःभोवती एक मानसिक पिंजरा तयार केला आहे. त्याला माहिती आहे की बाहेर व्यवस्था सडलेली आहे, सर्वकाही चुकीचे घडत आहे, पण तो आपल्या मनाला रोज एकच डोस पाजतो—"ऑल इज वेल". युनिव्हर्सिटीमधून मिळालेली मोठी डिग्री, वाचलेली जागतिक दर्जाची पुस्तकं किंवा ती प्रसिद्ध 'मोटिव्हेशनल' पुस्तक मालिका (जी माणसाला संकटातही सकारात्मक राहायला शिकवते) माणसाला या पिंजऱ्यातून बाहेर काढू शकत नाहीत. उलट, ही पुस्तकं आणि विचार त्याला या गुलामगिरीत 'कसे आनंदी राहायचे' याचेच प्रशिक्षण देतात. तो चुकीच्या गोष्टी डोळ्यांनी पाहतो, पण मनाला समजवतो, पुढे निघून जातो आणि आपली 'मजबुरी' विसरण्यासाठी पुन्हा त्याच चक्रात अडकतो.
'स्पिरिट ऑफ मुंबई' हा खरं तर सामान्य माणसाच्या हतबलतेचा आणि सहनशीलतेचा गैरफायदा घेण्यासाठी तयार केलेला एक भ्रम आहे. ही एक अशी 'मजबुरी' बनली आहे, जिथे माणूस रोज मरतो, रोज घाबरतो, पण पोट भरण्यासाठी त्याला रोज हसावं लागतं आणि धावावं लागतं. हा इतिहास पराक्रमाचा नाही, तर एका व्यवस्थेने सामान्य माणसाला आपल्या पिंजऱ्यात कसे गुलाम बनवून ठेवले आहे, याचा जिवंत पुरावा आहे. पुस्तकी ज्ञान माणसाला प्रश्न विचारायला शिकवण्याऐवजी, आहे त्या परिस्थितीत कसं "ॲडजस्ट" करायचं हेच शिकवतंय, ही आजच्या सुशिक्षित मध्यमवर्गाची सर्वात मोठी शोकांतिका आहे. २६/११ चा हल्ला, लोकल स्फोट, रोजचे अपघात आणि नालासोपारा हत्याकांडासारख्या घटनांनंतर मध्यमवर्गीयाला एक गोष्ट पक्की समजली आहे—"इथे आपल्याला वाचवायला कोणीही नाही." पोलीस, प्रशासन, नेते किंवा कायदा यांपैकी कोणीही त्याच्या संरक्षणाची हमी देऊ शकत नाही.जेव्हा माणसाचा व्यवस्थेवरचा विश्वास उडतो, तेव्हा तो अदृश्य शक्तीकडे धाव घेतो. "बाकी कोणी नाही, तर आता हा देव, हा धर्मच आपल्याला वाचवेल," या भावनेतून आज मुंबईत धार्मिकतेकडे लोकांचा ओढा प्रचंड वाढला आहे.
याच अगतिकतेचा गैरफायदा घेऊन समाजात वेगवेगळ्या 'बाबां'चे, गुरूंचे आणि देवाचे अनुयायी म्हणून वावरणाऱ्यांचे पेव फुटले आहे. स्वतःला असुरक्षित समजणारा सामान्य माणूस या बाबांच्या कच्छपी लागतोय, कारण त्याच्या मनातली अनामिक भीती त्याला तिथे क्षणिक मानसिक शांतता किंवा आडोसा देते. ही वाढती संख्या धार्मिक क्रांती नसून, ती मुंबईकरांच्या खोलवर रुजलेल्या असुरक्षिततेचे लक्षण आहे.मुंबई आता भौगोलिक आणि मानसिकदृष्ट्याही पूर्वेसारखी राहिलेली नाही. घरांच्या गगनचुंबी किमतींमुळे सामान्य मध्यमवर्गीय माणूस मुंबईच्या वेशीबाहेर—डोंबिवली, कल्याण, बदलापूर, विरार, आणि त्याहूनही पुढे फेकला गेला आहे.
आणखी एक कटू सत्य म्हणजे, माणूस ऑफिसमधील कामाच्या प्रेशरने तितका थकत नाही, जितका तो रोजच्या अमानुष प्रवासाने थकतो. लोकलच्या दारात लटकणे, गर्दीशी दोन हात करणे, ट्रॅफिकमध्ये तास न तास अडकणे यातच त्याची निम्मी ऊर्जा संपून जाते. या बेसुमार वाढीने आणि थकव्याने मध्यमवर्गीय मानसिकतेला एक प्रकारची कीड लावली आहे. त्या माणसाने आता स्वतःला मनापासून समजावून टाकले आहे—"इथे असंच होणार, हे असंच चालणार आणि यात कधीच बदल होणार नाही." हा स्वीकार म्हणजे जिवंतपणे स्वतःचे मरण स्वीकारण्यासारखे आहे.आजची मुंबई एखाद्या मोठ्या क्लबसारखी झाली आहे, जिथे माणसाच्या लायकीनुसार त्याला 'मेंबरशिप' दिली जाते.परमनंट मेंबर्स (शाश्वत वर्ग): ज्यांच्याकडे स्वतःची घरे आहेत, गाड्या आहेत, जे दक्षिण मुंबईत किंवा उच्चभ्रू वस्त्यांमध्ये राहतात, ज्यांना या रोजच्या लोकलच्या नरकयातना भोगाव्या लागत नाहीत. मुंबईची संसाधने आणि सुख सोयी यांच्यावर या परमनंट मेंबर्सचा ताबा आहे.टेम्परेरी मेंबर्स (तात्पुरता वर्ग): हा तो अगतिक मध्यमवर्ग आहे, जो फक्त रोज सकाळी या क्लबमध्ये 'काम करण्यासाठी' आणि राबण्यासाठी येतो आणि रात्री थकून-भागून आपल्या लांबच्या खोपटात परत जातो. ते मुंबईत राहतात, पण मुंबई त्यांची नाही. ते या शहराचे फक्त 'टेम्परेरी मेंबर्स' आहेत, ज्यांना कधीही बाहेर फेकले जाऊ शकते. 'ऑल इज वेल'चा मुखवटा चढवून जगणारा आजचा मुंबईकर प्रत्यक्षात एका मोठ्या मानसिक कोंडवाड्यात अडकला आहे. वाढती धार्मिकता, बाबांचे पाय धरणे, प्रवासाने आलेले अकाली वृद्धत्व आणि "असंच चालणार" ही विचारसरणी—हे सर्व मुंबईच्या तथाकथित 'स्पिरिट'चे खरे रूप आहे. मुंबई आता स्वप्नांची नगरी राहिलेली नाही, तर ती मध्यमवर्गीयांच्या अगतिकतेचा आणि मजबुरीचा एक अथांग समुद्र झाली आहे, जिथे प्रत्येक जण फक्त बुडण्यापासून वाचायचा प्रयत्न करतोय.
मुंबईत जशा कॉर्पोरेटच्या काचेच्या उंच इमारती वाढत आहेत, तशाच त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या पानटपऱ्या आणि तिथे लागणाऱ्या गर्दीच्या रांगाही वाढत आहेत.लाख-लाख रुपये पगार घेणारी आजची तरुण पिढी—मुलं आणि मुली दोन्ही—या टपऱ्यांवर एकामागून एक सिगरेट फुंकताना दिसतात. त्यांच्या या धुराच्या विळख्यामागे कोणतीही फॅशन नसते, तर तिथे चर्चा असते ती कामाच्या प्रेशरची, कटकट्या बॉसची आणि डेडलाईन्सची. ऑफिसमध्ये होणाऱ्या मानसिक कुचंबणेची सवय करून घेण्यासाठी, तो ताण विसरण्यासाठी त्यांना सिगरेटच्या धुराचा आणि निकोटीनचा आधार घ्यावा लागतोय.
सोमवार ते शुक्रवार या कुचंबणेच्या पिंजऱ्यात काढल्यानंतर, विकेंडला मुंबईतले सगळे बार आणि क्लब्स हाऊसफुल होतात. तिथून वाहणारा दारूचा ओघ हा सणाचा आनंद साजरा करण्यासाठी नसतो, तर पाच दिवसांचा तो अमानुष थकवा आणि अगतिकता मनातून काही काळासाठी पुसून टाकण्यासाठी घेतलेली ती एक 'भूल' असते.
या रोजच्या मानसिक कुचंबणेचा सर्वात मोठा फटका आजच्या माणसाच्या वैयक्तिक नात्यांना बसला आहे.जेव्हा पती आणि पत्नी दोघेही त्याच अमानुष प्रवासातून, त्याच कॉर्पोरेट प्रेशरमधून आणि मानसिक कोंडवाड्यातून जात असतात, तेव्हा त्यांच्यातलं एकमेकांबद्दलचं आदराचं आणि प्रेमाचं नातं कोरडं होऊ लागतं. घरी आल्यावर एकमेकांना समजून घेण्याऐवजी, स्वतःचा संताप आणि नैराश्य एकमेकांवर दोषारोप (Blame game) करून काढले जाते. या मध्यमवर्गीय कुचंबणेमुळे आजची कुटुंबव्यवस्था धोक्यात आली आहे. आई-वडिलांकडे मुलांशी संवाद साधायला न शारीरिक ऊर्जा उरते, न मानसिक शांतता. परिणामी, पालकत्वाच्या नात्याला एक मोठी तडा गेली आहे. मुलं पैशांनी समृद्ध होत आहेत, पण संस्कार आणि आई-वडिलांच्या सहवासाला पारखी होत आहेत.यावर कोणताच एक ठरलेला जागतिक उपाय नाही. कारण या कुचंबणेचं प्रत्येकाचं मीटर वेगळं आहे आणि हा पेपर सोडवायची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. पण या पिंजऱ्यातून बाहेर पडण्यासाठी काही मूलभूत पावले उचलणे गरजेचे आहे. सर्वात आधी स्वतःला हे समजवणे गरजेचे आहे की, रोज मरण सहन करणे हे माझे 'शौर्य' नाही, ती माझी मजबुरी आहे. या शब्दाच्या ग्लॅमरला भुलणे बंद केले पाहिजे. चुकीच्या गोष्टीला चुकीचे म्हणायला शिकणे. "असंच चालणार" हा स्वीकार न करता, आपल्या परीने परिस्थिती बदलण्याचा किंवा किमान स्वतःला त्या मानसिकतेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणे. विकेंडची दारू किंवा सिगरेटचा धूर हा ताण कमी करत नाही, तर तो मानसिक आजार वाढवतो. त्याऐवजी कुटुंबाशी संवाद, कला, निसर्गाशी जवळीक यांसारख्या निरोगी पर्यायांकडे वळणे. कामाचा पगार मिळतो, आपल्या आयुष्याचा नाही. ऑफिसचे प्रेशर आणि वैयक्तिक आयुष्य याच्यात एक स्पष्ट रेषा आखणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
मुंबई आता पूर्वीसारखी राहिलेली नाही, तिला आता या 'अगतिक मध्यमवर्गीय मानसिकतेची कीड' लागली आहे. आपण एका अशा चक्रव्यूहात अडकलो आहोत जिथे आपण रोज धावतोय, पण पोहोचत कुठेच नाही आहोत. आता वेळ आली आहे की, आपण या तथाकथित 'स्पिरिट'च्या खोट्या मुखवट्याकडे वास्तवाच्या दृष्टीने पाहावे. जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या पातळीवर या कुचंबणेविरुद्ध आवाज उठवत नाही किंवा स्वतःला या पिंजऱ्यातून बाहेर काढत नाही, तोपर्यंत मुंबईकर फक्त एक 'चालता-बोलता सांगाडा' बनूनच जगत राहील.

अमित अशोक परब 

No comments:

Post a Comment